
Wardha News : शेतमालाच्या खरेदीनंतर २४ तासात चुकारे देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. याला हरताळ फासत कापूस उत्पादकांना चार ते सहा दिवसांचे धनादेश देऊन त्यांची बोळवण करण्यात येत होती.
या बाबत तक्रारी झाल्यानंतर त्याची दखल घेत देवळी बाजार समितीच्या प्रशासकांनी निर्देश व्यापाऱ्यांना दिले आहेत.
देवळी बाजार समितीअंतर्गत खासगी जिनिंग प्रेसिंगच्या माध्यमातून कापसाची खरेदी केली जाते. शासन निर्देशानुसार कोणत्याही शेतमालाचे चुकारे व्यापाऱ्यांनी २४ तासांच्या आत करणे क्रमप्राप्त आहे.
परंतु देवळी बाजार समितीअंतर्गत व्यापाऱ्यांकडून खरेदी होणाऱ्या कापसाचे चुकारे देण्यात पाच ते सहा दिवसांचा विलंब केला जात होता. या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष व्याप्त होता.
याबाबत काही शेतकऱ्यांनी देवळी बाजार समितीकडे तक्रारी केल्या. त्याची दखल घेत बाजार समितीचे प्रशासक प्रकाश भजनी यांनी व्यापाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली.
या बैठकीत कापूस तसेच इतर सर्व शेतमालाचे चुकारे २४ तासांच्या आत करण्याचे निर्देश देण्यात आले. शिवाय शेतमाल खरेदीची कुवत असलेल्या व्यापाऱ्यांनीच या व्यवसायात पडावे. अन्यथा दुसऱ्यांसाठी ही जागा खाली करून द्यावी, अशी तंबी देखील दिली.
व्यापाऱ्यांनी देखील या वेळी काही मुद्दे उपस्थित करून प्रशासकांनी त्याचे निराकरण करावे, अशी मागणी केली. त्यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या नावावर परिसरातील काही कमिशन एजंट या व्यवसायात आहेत. त्यांच्याकडून व्यापाऱ्यांना नाहक त्रास दिला जातो.
जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीच्या परिघात कमी दर्जाच्या कापसावरून हुज्जत घातली जाते. त्यामुळे बाजारात कापूस विक्रीसाठी आणणारा शेतकऱ्याकडे लिलावाच्या वेळी तसेच चुकारा घेताना सातबारा, आधार कार्ड अनिवार्य करावे अशी मागणी करण्यात आली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.