
Amravati News : जिल्ह्यातील ५५८५ शेतकऱ्यांच्या पीकविमा परताव्याचा मुद्दा गेल्या तीन महिन्यांपासून प्रलंबित होता. त्यांना परतावा देण्यासंदर्भातील प्रक्रिया विमा कंपनीकडून (Insurance Company) हाती घेण्यात आली आहे. परिणामी, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उर्वरित १७ हजार शेतकऱ्यांना देखील लवकरच परतावा मिळेल, अशी माहिती विमा कंपनीच्या सूत्रांनी दिली.
गेल्या खरीप हंगामात संततधार पाऊस, अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीनंतर बाधित एक लाख २५ हजार ९०२ शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीकडे पूर्वसूचना दाखल केल्या होत्या.
कंपनीद्वारा त्यापैकी ९९,५१८ पूर्वसूचना स्वीकारण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ६१ हजार २८५ शेतकऱ्यांना ६६.८२ कोटीचा परतावा आतापर्यंत कंपनीद्वारे देण्यात आला आहे. अद्यापही २३ हजारांवर बाधित शेतकऱ्यांना परतावा मिळालेला नव्हता.
यापैकी ५५८५ शेतकऱ्यांना गुरुवार (ता. ९) पासून परतावा देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या बाधित शेतकऱ्यांना कंपनीद्वारा किती परतावा देण्यात आला याची माहिती अद्याप कृषी विभागाकडे अप्राप्त आहे. खरिपामध्ये पीक काढणीच्या हंगामात पिकाचे नुकसान झाल्याबाबत दहा हजार ५६७ शेतकऱ्यांना १२.८६ कोटीचा पीकविमा परतावा देण्यात आला असे सांगितले जाते.
प्रत्यक्षात एकही शेतकऱ्याला परतावा मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष व्याप्त आहे.
आंदोलनामुळे कंपन्यांकडून भरपाईस सुरुवात
पीकविमा परताव्या संदर्भात विमा कंपनीकडून सातत्याने टाळाटाळ होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अनेक शेतकरी संघटनांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात वारंवार आंदोलन केली. त्याचीच दखल घेत विमा कंपनीकडून भरपाईसाठी पुढाकार घेण्यात आला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.