
Solapur News : अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने खास पीक संरक्षण या विषयावर नुकतेच ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणेचे माजी संचालक तथा विद्यमान प्रधान शास्त्रज्ञ डॉ. आर. जी. सोमकुंवर, राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती येथील पाणी ताण व्यवस्थापन विभागाचे भाजीपाला शास्त्रज्ञ डॉ. प्रतापसिंह खपाटे यांनी प्रामुख्याने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्र, सोलापूरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे होते. यामध्ये विविध भागातील शेतकऱ्यांसह अक्कलकोट तालुका कृषी अधिकारी आर. एस. माळी व मंडल कृषी अधिकारी शिवाजी येमुल उपस्थित होते.
डॉ. सोमकुंवर म्हणाले, की तापमानातील चढ-उतारामुळे अवकाळी पाऊस व गारपीट झाली असून, द्राक्षामध्ये गारांचा मार लागून मण्यांना तडे गेले असतील, मणीगळ झाली असेल तर ते गोळाकरून बागेबाहेर खड्यात घालून नष्ट करावे, जेणेकरून त्यातून द्रावणाऱ्या रसामुळे दुय्यम प्रादुर्भाव होणार नाही.
तसेच ट्रायकोडर्माची फवारणी दोन ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणे जमिनीवर तसेच बागेवर करावी.
राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था बारामतीचे पाणी ताण व्यवस्थापन विभागाचे भाजीपाला शास्त्रज्ञ डॉ. खापटे यांनी भाजीपाला पिकाची पाने फाटून व फांद्यावर जखमा किंवा फांद्या तुटल्या असतील, अशावेळी या पिकांना खत व्यवस्थापन करून झांडाची पुन्हा वाढ कशी होईल, याचे नियोजन करावे, असे सांगितले.
यासह शेतकऱ्यांच्या विविध शंकांवरही शास्त्रज्ञांनी उत्तरे दिली. श्री. तांबडे, माळी यांनीही मार्गदर्शन केले. यामध्ये दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, उत्तर सोलापूर, मंगळवेढा आणि पंढरपूर तालुक्यातील युवा शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विषय विशेषज्ञ प्रदीप गोंजारी यांनी केले. तर समाधान जवळगे यांनी आभार मानले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.