Nashik News : कांद्याचे आगार म्हणून ओळख असलेल्या लासलगावसह परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. एकीकडे कांद्याला बाजार भाव नाही, तर दुसरीकडे गारपीट आणि अवकाळी पावसात काढून ठेवलेला कांदा ओला झाल्याने सडू लागला आहे.
लासलगावजवळील पिंपळद (ता. चांदवड) येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय निवृत्ती टोपे यांनी अडीच एकरात उन्हाळ कांद्याचे पिक घेतले. त्यासाठी त्यांनी ७० हजार रुपयांचे पीक कर्ज आणि पत्नीचे मंगळसूत्र व सोन्याचे अन्य दागिने बँकेत गहाण ठेऊन सोनेतारण कर्ज घेतले होते.
पोटच्या मुलाप्रमाणे संगोपन केलेले उन्हाळ कांद्याचे पीकही जोमदार आले. कांदा काढणीला सुरुवात झाली अन् कांद्याचे बाजारभाव कोसळले. त्यामुळे त्यांनी बाजारभाव वाढतील तेव्हा हा कांदा विक्री करू, या हेतुने चाळीमध्ये साठवण्यास सुरुवात करण्याआधीच अस्मानी संकट कोसळले.
तीन ते चार दिवस सलग गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला. यामध्ये काढून ठेवलेला आणि शेतातील कांदा ओला झाल्याने सडू लागला आहे.
दहा ते पंधरा टक्केही कांदा हातात येणार नसल्याने, उत्पादन खर्च तर दूरच; वाहतूक आणि मजुरीही निघणार नसल्याने आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे. या अस्मानी संकटाने संपूर्ण स्वप्नांवर पाणी फिरवल्याचे कांदा उत्पादक शेतकरी टोपे सांगत आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.