
शेतकरी : पांडुरंग डावरे
गाव : कोनांबे, ता. सिन्नर,जि नाशिक
एकूण क्षेत्र : २.५ एकर
ढोबळी मिरची लागवड : ३५ गुंठे
नाशिक जिल्ह्यातील कोनांबे (ता.सिन्नर) येथील पांडुरंग डावरे हे गेल्या २० वर्षांपूर्वी पारंपरिक पिकांचे उत्पादन घ्यायचे. मात्र, जमीनधारणा कमी असल्याने उत्पन्न मर्यादित मिळायचे. त्यामुळे त्यांनी पारंपारिक पिकांकडून फलोत्पादनाकडे वळण्याचा निर्णय घेतला.
पुढे सिंचन सुविधांचा विकास करून भाजीपाला पिकात टोमॅटो, ढोबळी मिरची, तर हंगामी खरबूज, टरबूज पिकांची लागवड करण्यास सुरवात केली.
ढोबळी मिरची लागवडीत मागील १२ वर्षांपासून सातत्य ठेवले आहे. दरवर्षी शेडनेटमध्ये ढोबळी मिरचीची लागवड केली जाते. यावर्षी ७ जानेवारीस लागवड करण्यात आली. सध्या पिकामध्ये तोडे सुरु आहेत.
लागवडपूर्व नियोजन
वाण निवड करताना हवामान बदलास बळी न पडणारे, हिरवागार रंग, कीड-रोगांना प्रतिकारक, चार कप्पे असलेला फळांचा आकार, चकाकी व लांब पल्ल्याच्या बाजारात उत्तम टिकवणक्षमता इत्यादी बाबी विचारात घेतल्या जातात.
त्या अनुषंगाने योग्य वाणांच्या रोपांची रोपवाटिकेत आगाऊ मागणी नोंदविली जाते. लागवडीसाठी ४५ दिवसांच्या सशक्त व रोगमुक्त तयार रोपांची उपलब्धता करून पुनर्लागवड करतात.
लागवड नियोजन
लागवडीसाठी जमिनीची पूर्वमशागत केली जाते. जमीन भुसभुशीत करून ५ फूट रुंदीचे बेड तयार केले जातात. त्यावर शेणखत, सेंद्रिय खते, प्रोम यांचा वापर केला जातो.
बेडवर खतांचे बेसल डोस दिल्यानंतर सिंचनासाठी ठिबकच्या नळ्या टाकल्या जातात. त्यानंतर २५ मायक्रॉन जाडीचा मल्चिंग पेपर अंथरून घेतला जातो. जेणेकरून तण व्यवस्थापनावरील खर्च टाळला जाईल. तसेच बाष्पीभवन रोखले जाईल.
बेड तयार झाल्यानंतर साधारण ८ तास ठिबकद्वारे पाणी देत बेड चांगले भिजवून घेतले जातात.
रोपवाटिकेतून आणलेल्या ४० ते ४२ दिवसांच्या तयार रोपांची झिगझॅग पद्धतीने लागवड केली जाते. दोन रोपांत साधारण पाऊण फूट अंतर राखले जाते.
लागवडीनंतर साधारण २१ दिवस पिकास सिंचन केले जात नाही.
लागवडीनंतर २१ दिवस पिकास खत आणि बुरशीनाशकांची आळवणी केली जाते.
कीड-रोग व्यवस्थापन
ढोबळी मिरची पिकावर मूळकूज, भुरी, करपा यासह विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी पिकाचे सातत्याने निरिक्षण केले जाते. प्रादुर्भाव दिसून आल्यास शिफारशीप्रमाणे रासायनिक फवारणी घेतली जाते. पीक संरक्षण खर्च कमी करण्यासाठी जैविक निविष्ठांच्या वापरावर अधिक भर दिला जातो.
पिकावर फुलकिडे व लाल माशी यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. नियंत्रणासाठी शिफारशीनुसार दर ८ दिवसांच्या अंतराने निरीक्षणे नोंदवून फवारणीचे नियोजन केले जाते. पावसाळी हंगामात लागवडीनंतर सुरुवातीच्या काळात गोगलगायींचा प्रादुर्भाव दिसून येतो.
त्यासाठी नियंत्रणाच्या उपाययोजना केल्या जातात. यासह फळे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. लागवडीनंतर रोपे मर, करपा आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी स्पर्शजन्य जैविक बुरशीनाशकांची फवारणी केली जाते.
खत व्यवस्थापन
पिकाच्या वाढीच्या अवस्थेत खतांचे नियोजन करण्यासाठी वेळापत्रक निश्चित केले आहे. हंगाम साधारण ६ महिन्यांचा असतो. झाडाच्या वाढीच्या अवस्थेनुसार दोन दिवसाआड खतांची मात्रा दिली जाते.
यामध्ये झाडांची वाढ, फुलधारणा, फळाची पक्वता होण्यासाठी नत्र, स्फुरद आणि पालाश यांचा संतुलित वापर केला जातो. यासह पिकाची गरज ओळखून बोरॉन, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, लोह, जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा केला जातो.
काढणी, उत्पादन
लागवडीनंतर ६० दिवसांत तोडा सुरु होतो. सध्या पिकामध्ये तोडे सुरु असून आत्तापर्यंत ४ तोडे झाले आहेत. त्यातून ११ टन ढोबळी मिरची उत्पादन मिळाले आहे. अजून साधारण जुलै महिन्यापर्यंत १० ते १२ तोडे होतील. दर ६ दिवसांनी तोडे घेतले जातील.
आवश्यकतेनुसार मजुरांची उपलब्धता करून तोडणीचे नियोजन केले जाते. चांगले दर मिळविण्यासाठी काढणीवेळी हाताळणी आणि प्रतवारी या बाबी अत्यंत महत्त्वाच्या असतात. प्रतवारीवेळी चमक, रंग व एकसारखा माल हे निकष लावले जातात.
प्रतवारी करून चांगला दर्जेदार एकसारखा माल क्रेटमध्ये भरून बाजारात पाठवला जातो. फळांचे सरासरी वजन १५० ग्रॅम इतके असेल हे पाहिले जाते. प्रामुख्याने नाशिक येथील मार्केटमध्ये विक्री करण्यावर भर दिला जातो.
महत्त्वाच्या बाबी
पिकांच्या वाढीच्या अवस्थेत विद्राव्य खतांचा वेळापत्रकानुसार पूर्वनियोजन करून वापर.
संरक्षित पीक पद्धतीचा अवलंब. त्यासाठी ३२ गुंठे क्षेत्रावर शेडनेट उभारणी.
पिकाच्या गरजेनुसार एकसमान पाणी वितरण करणारी सूक्ष्म सिंचन प्रणाली.
एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी चिकट सापळ्यांचा वापर.
लागवडीनंतर महिनाभर विद्राव्य खतांची आळवणी. सुरुवातीच्या काळात २ दिवसाआड सूक्ष्म अन्नद्रव्ये पुरवठा.
दिवसाआड २० मिनिटे वाफसा अवस्था पाहून सिंचन करण्यावर भर.
कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वेळोवेळी पिकाचे निरिक्षण.
उत्पादन खर्च कमी करण्यासाठी जैविक निविष्ठांच्या वापरावर अधिक भर.
फुलकिडे नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशक फवारणीसोबतच निम व करंज तेलाचा वापर.
पांडुरंग डावरे, ७५८८०४०७३५ (शब्दांकन : मुकुंद पिंगळे)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.