
Nagar News : ऊसतोडणीनंतर पंधरा दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक असताना अनेक कारखान्यांनी ‘एफआरपी’ थकवली आहे. अशा कारखान्यांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षासह संचालकांवर कारवाई करण्यास विलंब केला जात आहे.
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांकडून १५ टक्के व्याजासह तातडीने रक्कम वसूल करावी आणि एफआरपी थकवल्याबाबत कारवाई करावी, अशी मागणी करत शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी अहमदनगर येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. कारवाई करणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
सहा महिन्याच्या गाळप हंगामात सुमारे साडेचार महिन्याहून अधिक काळ गाळप केलेल्या उसावर साखर कारखान्यांनी ऊस उत्पादन शेतकऱ्यांची एफआरपी सुमारे अडीच ते तीन हजार कोटी रुपये थकवलेली आहे.
त्या एफआरपी थकवणाऱ्या साखर कारखान्यांवर साडेचार महिने झाले तरीही साखर आयुक्तालयाकडून अध्यक्ष, संचालक मंडळावर आरआरसीची कारवाई केली नाही.
अहमदनगर जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी एफआरपी थकवलेली आहे. त्यावर १५ टक्के व्याज आकारून एफआरपी देण्याचे आदेश करावा. अशी मागणी करण्यात आली.
या मागणीसाठी शरद जोशी विचार म्हणजे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष अंबादास कोरडे पाटील, पंढरीनाथ कोतकर, दीपक फाळके, अनिल भांडवलकर, बाळासाहेब वर्पे, दिलीप लोखंडे, विठ्ठल पाटील लोखंडे, दौलत गणगे, संदीप गवारे, अनिल चव्हाण आदी ऊस उत्पादक शेतकरी व पदाधिकाऱ्यांनी अहमदनगर येथील प्रादेशिक संचालक (साखर) कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केले.
येथे अधिकारी उपस्थित नसल्याने आंदोलकांनी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला माळ घालून निषेध व्यक्त केला. विभागाचे उपप्रादेशिक संचालक साखर डॉ. प्रवीण लोखंडे एफआरपी संदर्भात कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.