
Nanded News : खरीप हंगाम २०२३-२४ साठी जिल्ह्याला लागणाऱ्या रासायनिक खताच्या (Chemical Fertilizer) नियोजनाची तयारी कृषी विभागाने सुरू केली आहे.
सरासरी सव्वादोन लाख टन खताचा वापर (Fertilizer Consumption) असणाऱ्या नांदेड जिल्ह्यासाठी आगामी खरिपासाठी दोन लाख ६३ हजार १८० टन खताची मागणी कृषी विभागाकडून राज्याच्या कृषी आयुक्तालयाकडे (Agriculture Commissionerate) केली आहे.
जिल्ह्यात हंगामी पिकांसह बागायती तसेच फळपिकांसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होतो. मागील चार वर्षांत दरवर्षी दोन लाख टन खताची आवश्यकता जिल्ह्यात असते. या दृष्टीने कृषी विभाग तयारी करतो.
खरीप हंगाम २०२३-२०२४ साठी जिल्ह्याला दोन लाख ६३ हजार १८० टन खताची आवश्यकता भासणार आहे. तशी मागणी नुकतीच राज्याच्या कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे.
आगामी काळात लागणाऱ्या रासायनिक खताच्या नियोजनाबाबत लातूर विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी नांदेडला नुकतीच बैठक घेऊन संबंधितांना नियोजन करण्याचे निर्देश दिले होते.
तसेच शेतकऱ्यांना खरिपापूर्वी खताची टंचाई जाणवणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले. जिल्ह्यात मागील हंगाम तसेच जानेवारीनंतर खताचा पुरवठा झाला आहे.
सध्या जिल्ह्यात विविध कंपन्यांची ५१ हजार ३५१ टन खते शिल्लक आहेत. यात डीएपी ५७३७ टन, युरिया ९१५९ टन, एमओपी ३८२२ टन, एनपीके २० हजार ९२७ टन, एसएसपी १२ हजार २०६ टन, कंपोस्ट ८८ टन खताचा समावेश आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा समतोल वापर करण्यासाठी माती परिक्षण करूनच रासायनिक खताचे नियोजन करावे, यासोबत सेंद्रिय खतासह कंपोष्ट खताचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.