
Satara News : पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी पायाभूत सुविधांचा विकास महत्त्वाचा आहे. त्यासाठीच तापोळा आणि बामणोली परिसरातील रस्त्यांचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात येत आहे. लवकरच कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा बामणोली-दरे पुलाचे काम सुरू होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
तापोळा (ता. महाबळेश्वर) येथे तापोळा-महाबळेश्वर रस्त्याचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता संतोष रोकडे आदी उपस्थित होते.
तापोळा ते महाबळेश्वर रस्ता अरुंद असल्याने वाहनचालकांना अनेक अडचणी येत असल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की या अडचणीमुळे काही पर्यटक तापोळा भागात येणे टाळत होते. पण आता हा रस्ता रुंद आणि मजबूत करण्यात येत आहे.
त्यामुळे महाबळेश्वरमध्ये येणारा प्रत्येक पर्यटक तापोळा भागात येईल. तापोळा, बामणोलीचा हा परिसर निसर्गसंपन्न आहे. याचा विकास करणे हा आमचा मुख्य उद्देश असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
तापोळा, बामणोली परिसराच्या विकासासाठी सुमारे नऊशे कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या दुर्गम भागातील तरुणांना नोकरीसाठी बाहेर जावे लागणार नाही, असा विकास केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.