
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी ‘शासन आपल्या दारी’ तसेच ‘बळीराजा सर्व्हेक्षण’ उपक्रमाचा आढावा घेतला.
या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, मनपाचे उपायुक्त रणजित पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी पी. आर. देशमुख आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पाण्डेय म्हणाले, की शासकीय योजनांची अंमलबजावणी गतिमान करताना योजनांचा लाभ शेवटच्या व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ लाभार्थींना मिळवून द्यावे.
सोबतच बळिराजा सर्व्हेक्षणाचे काम ३१ मेपूर्वी पूर्ण करावे. सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत, यासाठी ‘शासन आपल्या दारी’ अभियान राबविण्यात येत आहे.
नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ आणि विविध महत्त्वाची कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळणार आहेत. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्येक विभागाने लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ देण्यासाठी नियोजन करावे.
जिल्हा स्तरावरील सर्व शासकीय यंत्रणांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. श्री. मीना म्हणाले, की ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. यासोबतच बळिराजा सर्व्हेक्षणाच्या कामकाजात गती घ्यावी लागणार आहे.
सर्व्हे वेळेत करून शासनास अहवाल सादर करावा लागणार आहे. यामध्ये आपले गाव मागे राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. या वेळी विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाचे नियोजन सादर केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.