
- महारूद्र मंगनाळे
शेतात काम करणं ही गंमत नसते. तिथं शारीरिक क्षमतांचा कस लागतो. टोचणं, रूतणं, ठेचकाळणं, ओरबाडणं, मुरगाळणं चालूचं असतं.
पांढरपेशा समाज तापमान मोजत असतो तेव्हा शेतकरी भर उन्हात काम करीत असतात.
उन्हाळा, पावसाळा असो की, हिवाळा पाय चालतच असतात. पायाला भेगा पडलेल्या असतात. कातडी शूष्क बनून स्वत:लाच टोचत असते.
हाताच्या बोटाची, तळव्यांची कातडी कितीदा तरी निघते. आपलाच हात आपल्याच तोंडावरून फिरवायला नकोसा वाटतो.
कचकन् काटा पायात शिरला की मायोऽऽचे स्वर बाहेर पडतात. चालता चालता काटे ओरबाडतात अन् रक्त काढून जातात. शरीरावर नित्य नव्या खुणा तयार होतात, बुजून जातात.
अंगावरचे कपडे कितीतरी वेळा घामानं ओले होतात अन् तसेच वाळून जातात. घामाचा हा दर्प कुठल्याच परफ्यूमने जाणारा नसतो.
कष्टकऱ्यांना तो दर्पच येत नाही. मान अवघडते, पाठ आखडते, करक भरते, पाय लचकतो, हात मुरगाळतो. तरीही त्याला सुट्टी घेता येत नाही.
शेतकऱ्याला काम बसू देत नाही. पोटात आग पडली की, समोर येईल ते खाऊन मोकळा होतो. चौरस आहार हा शब्दच त्याच्या कानावर गेलेला नसतो.
एवढे कष्ट करूनही कोणतं संकट होत्याचं नव्हतं करेल, ते सांगता येत नाही. त्याच्या कष्टाचे मोल होण्याची शक्यता नसतानाही तो कष्टत राहतोय.
बाकी काही नाही तरी, किमान या कष्टांचा अवमान करण्याचा नीचपणा करू नका. हे कष्ट एकदा अनुभवून बघा म्हणजे कळेल, तुम्ही बांडगुळ आहात.
शेतीत असे अहोरात्र कष्ट घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने कमी होत चाललीय. ती व्हायलाच हवी. काही वर्षांत हे कष्टकरी संपतील.
तेव्हा समाजाला कष्टाचं महत्त्व कळेल. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.