
Solapur News : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग परिसरातील सुमारे दीड हजार हेक्टर जमीन जून २०२३ अखेर ओलिताखाली येणार असून, एकरुख उपसा जलसिंचन योजनेची वेगाने अंमलबजावणी करण्यात येत आहे.
उजनीतून येणाऱ्या ३.१८ टीएमसी पाण्याची दक्षिण व अक्कलकोटमधील शेतकरी मागील ३० वर्षांपासून चातकाप्रमाणे वाट पाहात आहे. कायम दुष्काळाच्या छायेत राहणाऱ्या लोकांना उजनी धरणातील पाणी म्हणजे मृगजळ वाटत होते; पण ते मृगजळ आता आवाक्यात आले आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख, तत्कालीन आमदार स्व. आनंदराव देवकते, स्व. उमाकांत राठोड यांनी १९९६ मध्ये या योजनेचे उद्घाटन हगलूर येथे पाणी परिषद घेऊन केले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, उजनी धरणात जादा होणारे पाणी एकरुख तलावात सोडले जाणार असून, तेथून बोरामणी येथे लिफ्ट केले जाणार आहे. बोरामणीतून एक कालवा दर्शनाळ मार्गे बोरी नदीला (दोन टीएमसी) तर दर्गनहळ्ळी मार्गे (१.१८ टीएमसी) वळसंग व होटगी परिसरात येणार आहे.
दर्गनहळ्ळी वडगाव, दिंडूर मार्गे कालव्यातून पाणी येणार असून, लिंबीचिंचोळी पासून बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे गुरुत्वाकर्षण शक्तीचा वापर करून लिंबीचिंचोळी १०५, वळसंग ३९८, आचेगाव २८१, शिंगडगाव ३१५, हणमगाव १८८, औज १८९ अशा जवळपास १४७६ हेक्टरला पाणी दिले जाणार आहे, असे उजनी कालवा उपविभाग क्रमांक ५७ चे शाखा अभियंता श्रीशैल बोधले यांनी सांगितले.
शिंदे- फडणवीस सरकारने जलसंधारणाच्या कामाला विशेष महत्त्व दिले असून विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या कार्यकाळात हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण होईल, अशी अपेक्षा परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.