
केऱ्हाळे बुद्रुक, पिंप्री, मंगरूळ (ता. रावेर, जि. जळगाव) येथे अतुल मधुकर पाटील यांची भोकर व अभोळा नदीच्या लाभक्षेत्रात ५० एकर जमीन (land) आहे. त्यापैकी साधारण २१ एकरांवर नवती केळीची (Banana) जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत टप्प्याटप्प्याने लागवड केली आहे. सध्या त्यांच्याकडे २१ एकरांत सुमारे ३४ हजार केळी झाडे आहेत. संपूर्ण क्षेत्रावरील लागवडीसाठी उतिसंवर्धित रोपांचा उपयोग केला आहे.
व्यवस्थापनातील बाबी ः
सध्या जून लागवडीतील झाडे सव्वापाच महिन्यांची झाली आहेत. वाढीच्या अवस्थेनुसार खत आणि सिंचनावर विशेष दर देत आहे.
मागील महिनाभरात साधारण दोन वेळा झाडाला आलेले फुटवे कापून घेतले. कारण, फुटवे अधिक वाढल्यास मुख्य झाडाच्या वाढीस अडथळा आणतात. त्यासाठी फुटवे कापून बागेतील सरीत टाकले आहेत.
सततच्या पावसामुळे बागेत आणि बांधावर गवत वाढले होते. तणनियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर टाळला. मजुरांच्या मदतीने गवत कापून बांध स्वच्छ केले.
थंडीच्या काळात बागेत करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची हमखास शक्यता असते. सध्या बागेतील काही झाडांवर कमी प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यासाठी बुरशीनाशकांची प्रतिबंधात्मक फवारणी घेतली.
आगामी नियोजन ः
वेळापत्रकानुसार ठिबकद्वारे रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या जातील. पुढील १० दिवसांत प्रामुख्याने झिंक, फेरस, कॅल्शिअम नायट्रेट यांची ठिबकद्वारे मात्रा दिली जाईल.
आवश्यकतेनुसार बागेत वाढलेले गवत काढून बाग स्वच्छ ठेवण्यावर विशेष भर दिला जाईल.
झाडाभोवती निंबोळी पेंड दिली जाईल. जेणेकरून मुळांच्या जवळील जमिनीचे तापमान वाढून त्यांची कार्यक्षमता वाढते.
ठिबकद्वारे एनपीके, रायझोबिअम, पीएसबी खते दिली जातील.
बागेतील फुटवे मुख्य झाडाच्या वाढीवर परिणाम करतात. त्यासाठी अतिरिक्त वाढलेले फुटवे एक वेळ काढले जातील.
डिसेंबर महिन्यात जळगाव, सातपुडा भागातील किमान तापमान ५ ते ६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येते. त्यामुळे या काळात बागेला योग्य प्रमाणात पाणी देणे अत्यंत आवश्यक आहे. तापमानाचा अंदाज घेऊन शक्यतो रात्री सिंचन करण्यावर भर दिला जाईल.
वाढत्या थंडीमुळे बागेत करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बागेतील झाडांचे सातत्याने निरीक्षण केले जाईल. प्रादुर्भावग्रस्त पाने कापून बागेबाहेर नेऊन त्यांची योग्य विल्हेवाट लावली जाईल. आवश्यकतेनुसार रासायनिक फवारणी केली जाईल.
रात्रीच्या वेळी बागेतील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी शेकोट्या पेटविल्या जातील.
अतुल पाटील ९८२२४५१६२१
(सायंकाळी सहा ते नऊ वेळेत संपर्क साधावा.)
(शब्दांकन ः चंद्रकांत जाधव)
खत व्यवस्थापन
सध्या थंडीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे वेळापत्रकानुसार खतांचे नियोजन केले जाईल.
झाडाजवळ दाणेदार २४ः२४ः० खत ५० किलो प्रमाणे प्रति एक हजार झाडांना दिले.
मागील काही दिवसांत किमान तापमान १२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. या काळात पिकाला अन्नद्रव्यांची मात्रा देणे अत्यंत आवश्यक असते.
प्रति एक हजार मॅग्नेशिअम सल्फेट २ किलो, युरिया ८ किलो या प्रमाणे ड्रीपद्वारे मात्रा दिली.
दर आठ दिवसांनी अमोनिअम सल्फेट ८ किलो, पोटॅश १२ किलो प्रति १ हजार झाडे प्रमाणे ड्रीपद्वारे दिले.
सिंचन व्यवस्थापन
सध्या थंडीच्या प्रमाणात वाढ होत आहे. तापमानात घसरण झाल्याने सिंचनावर विशेष लक्ष दिले आहे.
बागेतील ओलावा आणि झाडाची पाण्याची गरज पाहून दिवसाआड रात्री ३ तास सिंचन केले जाते.
बागेतील झाडांचे थंड वाऱ्यापासून संरक्षण
करण्यासाठी बागेभोवती वारारोधक कुंपण गरजेचे
असते. त्या अनुषंगाने बागेभोवती पश्चिम व दक्षिण
दिशेला वारा अवरोधक कुंपण म्हणून शेवरी पिकाची लागवड केली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.