
शेतकरी : अतुल मधुकर पाटील
गाव : केऱ्हाळे बुद्रुक, ता. रावेर, जि. जळगाव
एकूण क्षेत्र : ५० एकर
केळी लागवड : २१ एकर (३२ हजार पाचशे झाडे)
जळगाव जिल्ह्यातील केऱ्हाळे बुद्रुक (ता. रावेर) येथील अतुल पाटील यांनी मागील वर्षी जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत टप्प्याटप्प्याने केळी लागवड केली आहे. सध्या त्यांच्याकडे २१ एकरांत सुमारे ३२ हजार पाचशे केळी झाडे आहेत.
संपूर्ण क्षेत्रावरील लागवडीसाठी उतिसंवर्धित रोपांचा उपयोग केला आहे. लागवड ६ बाय ५ फूट व साडेपाच बाय ५ फूट अंतरावर गादीवाफा पद्धतीने केली आहे. जमीन मध्यम, पाण्याचा निचरा करणारी असल्याने त्या दृष्टीनेच सर्व बाबींचे नियोजन केले जाते.
निर्यातक्षम केळी उत्पादन घेण्याची अतुलराव प्रयत्न करतात. केळी बागेचे संपूर्ण व्यवस्थापन हे जळगाव येथील अखिल भारतीय फळे (केळी) संशोधन केंद्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते.
व्यवस्थापनातील बाबी
- सध्या केळी बागेतील झाडे सव्वानऊ महिन्यांची झाली आहेत. मागील दोन महिन्यांपूर्वी बागेत निसवण सुरू झाली आहे. निसवण काळात झाडांची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. त्यानुसार सर्व बाबींचे नियोजन करून व्यवस्थापनावर भर देण्यात आला आहे.
- मागील काही दिवसांपासून अद्यापपर्यंत विषम हवामान स्थिती आहे. काही दिवस ढगाळ हवामान तर सध्या उष्णता अशी हवामान स्थिती आहे. मध्यंतरीच्या काळात पाऊसही झाला.
मागील महिन्यात साधारण ४ ते ७ मार्च व ९ ते १७ मार्च या काळात ढगाळ हवामान आणि पाऊस अशी स्थिती होती. या हवामान स्थितीचा निसवण होत असलेल्या झाडांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. या काळात वाऱ्याचा वेगही जास्त होता. त्यामुळे बागेतील काही झाडांची पाने फाटली आहेत.
- मागील काही दिवसांत बागेत करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला होता. त्यासाठी बुरशीनाशकांच्या फवारण्या घेण्यात आल्या. तसेच तापमानात वाढ झाल्याने सध्या बागेत रोगाचा प्रादुर्भाव पूर्णपणे नाहीसा झाला आहे.
- निसवलेल्या घडांतील फण्यांची सातत्याने विरळणी सुरू आहे. तसेच घडावरील पाने कापून काढली जात आहेत. एका घडाला साधारण ९ फण्या ठेवल्या जात आहेत.
- मागील महिनाभराच्या काळात घडांवर एक वेळ बुरशीनाशके व कीडनाशकांची फवारणी घेतली आहे. तसेच केळ फुलामध्ये बड इंजेक्शन देण्याची कार्यवाही सुरू आहे. यामुळे फुलकिडींचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होते. आणि निर्यातक्षम घड उपलब्ध होतात.
- सध्या घड व्यवस्थापनावर अधिक भर देणे गरजेचे आहे. घडांच्या संरक्षणासाठी स्कर्टिंग बॅग लावण्याची कार्यवाही करण्यात आली. तसेच घड केळीच्या कोरड्या पानांचा चुडा करून झाकून घेतले. त्यामुळे उष्णतेपासून घडांचे संरक्षण होण्यास मदत झाली.
- केळी झाडे घडाच्या वजनाने वाकण्याची शक्यता असते. त्यामुळे झाडे खोडाच्या मध्यात मोडण्याची शक्यता असते. त्यासाठी झाडांना आधार दिला आहे. तसेच घड दोरीच्या साह्याने झाडाला बांधून घेतले जात आहेत.
- सध्या रात्री काहीसे थंड तर दिवसाच्या वेळी उष्ण अशी हवामान स्थिती आहे. या स्थितीत खत व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.
खत व्यवस्थापन
- बागेची निसवण ७० टक्के पूर्ण झाली आहे. त्यामुळे खत आणि सिंचन व्यवस्थापनावर अधिक भर देत आहे. त्यामुळे निसवण एकसारखी होऊन घड झाडात अडकण्याची समस्या टाळली जाते.
- मागील महिनाभरात दर १० दिवसांच्या अंतराने १३ः०ः४५ हे खत अडीच किलो, पोटॅशिअम शोनाईट ३ किलो आणि ०ः०ः५० हे विद्राव्य खत अडीच किलो प्रति १ हजार झाडे याप्रमाणे ठिबकद्वारे आलटून-पालटून देत आहे. त्यामुळे घड पक्व होण्याची प्रक्रिया वेगाने होऊन निसवण होण्यास फायदेशीर ठरते आहे. घडाला चकाकी मिळून दर्जेदार केळी तयार होतात.
- तसेच कॅल्शिअम नायट्रेट ३ किलो आणि बोरॉन ५०० ग्रॅम प्रति १ हजार झाडे याप्रमाणे मात्रा दिली जात आहे. सोबत विद्राव्य स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्येही दिली आहेत.
मागील कामकाज :
- मुख्य झाडांभोवतीचे फुटवे दर १० दिवसांनी काढून घेतले.
- ठिबकच्या तोट्या, व्हॉल्व्हदेखील स्वच्छ करून घेतले. कारण पाण्यातून गाळ, माती व वाळूचे कण येतात. त्यामुळे सिंचनात अडथळे येण्याची शक्यता असते आणि झाडांना वाढत्या उष्णतेमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही.
- सध्या विषम हवामान स्थिती असली तरी दररोज किमान ४ तास १० लिटर पाणी प्रति झाड याप्रमाणे दिले जात आहे. कमाल तापमान सातत्याने कमी अधिक होत आहे. मात्र ते ३५ अंश सेल्सिअसच्या खाली नसल्याने रोज किमान ४ तास पाणी देण्याची कार्यवाही सुरूच राहील.
आगामी नियोजन
- सध्या ७० टक्के निसवण पूर्ण झाली असून, पुढील काळातही बागेत निसवण सुरूच राहील. उर्वरित निसवण योग्यरीत्या होण्यासाठी खत व्यवस्थापनावर भर दिला जाईल.
- तापमानात वाढ होत आहे. उष्णतेमुळे कोवळे घड होरपळ्याची शक्यता असते. त्यामुळे निसवलेल्या घडांना बड इंजेक्शन आणि स्कर्टिंग बॅग लावण्याची कार्यवाही सुरूच राहील. त्यानंतर केळीच्या कोरड्या पानांच्या साह्याने एक चुडा करून झाकून घेण्याचे काम सातत्याने केले जाईल.
- पक्व घडांचे निरीक्षण सातत्याने केले जाईल. घडांच्या अधिक वजनामुळे झाडे कोसळू नये यासाठी गरजेनुसार बांबूच्या साह्याने आधार दिला जाईल.
- तापमानात वाढ होत असल्याने दैनंदिन सिंचनावर भर दिला जाईल. प्रतिदिन १० लिटर पाणी दिले जाईल. कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास रोज पाच तास १२ लिटर पाणी दिले जाईल.
- बागेतील फुटवे सतत वाढत राहतात. या फुटव्यामुळे मुख्य झाडांना अन्नद्रव्यांचा व्यवस्थित पुरवठा होण्यास अडचणी येतात. त्यासाठी फुटवे काढण्याचे काम सुरूच राहील.
- सुरुवातीच्या टप्प्यात बागेत कुकुंबर मोझॅक विषाणूंच्या (सीएमव्ही) प्रादुर्भाव झाला होता. त्यासाठी अधिक नांग्या भराव्या लागल्या. त्यामुळे बागेत एकसारखी निसवण झालेली नाही आहे. त्यासाठी झाडांच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापनावर भर दिला जाईल.
- ढगाळ वातावरण आणि रात्रीचे तापमान १६ अंश सेल्सिअसखाली राहिल्यास बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळून येण्याची शक्यता असते. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आवश्यकतेनुसार बुरशीनाशकांची फवारणी घेतली जाईल.
- दर्जेदार केळी उत्पादनासाठी झाडांचे सातत्याने निरीक्षण केले जाईल.
अतुल पाटील, ९८२२४५१६२१, (सायंकाळी सहा ते नऊ वेळेत संपर्क साधावा.)
(शब्दांकन : चंद्रकांत जाधव)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.