
Nanded Soyben, cotton News : कापशीसह सोयाबीनच्या दरात मागीलवर्षीच्या तुलनेत बरीच घसरण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल घरातच साठवून ठेवले आहे.
आज ना उद्या दर वाढतील याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. प्रमुख शेतीमालाचे दर पडल्याने शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यातील शेतकरी मागील काही वर्षापासून नगदी पीक म्हणून सोयाबीन, कपाशी या पिकाकडे वळले आहेत. मागील खरिपामध्ये चार लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती तर दोन लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती.
जुलैमधील अतिवृष्टीने सोयाबीन, कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यातून काही प्रमाणात शिल्लक राहिलेल्या या पिकांच्या काढणीनंतर दरात घसरण झाल्याने शेतकरी कमालीचे अडचणीत आले आहेत.
यंदा कपाशीला चांगला भाव मिळेल, अशी आशा बाळगून असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. गतवर्षी कापसाला दहा हजाराच्या पुढे भाव मिळाला होता.
यंदाही सुरवातीला चांगला भाव सुरळीत सुरु असताना मागील दोन महिन्यापासून कापसाचे भाव सात हजारापर्यंत खाली आले आहेत.
दोन महिन्याखाली सहा हजार ते सहा हजार दोनशे रुपयापर्यंत गेलेले दर सध्या पाच हजारापर्यंत खाली आले आहेत. शेतीमालाचे भाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन विकण्याऐवजी घरात साठवून ठेवणे पसंत केले आहे.
शेतीमालाचे दर पडण्यामागे शासनाचे चुकीचे धोरण असल्याची भावना शेतकऱ्यांत व्यक्त होत असल्याने शेतकरी शासनकर्त्यांवर नाराजी व्यक्त करीत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.