
Nagar News : या वर्षभरात मोसमी पावसापेक्षा अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) शेतकरी वर्गाच्या तोंडचे पाणीच पळवले आहे. सुरुवातीला खरिपाच्या पेरणीला पावसाने ताण दिला. त्यामुळे अनेकांच्या मूग, तूर, सोयाबीन, उडीद, ज्वारी, बाजरी, कांदा, भाजीपाला पिकांच्या लागवडीचे काम लांबणीवर पडले.
त्यातही हिंमत धरून बळिराजाने पेरणी केली. जोमात आलेल्या पिकांना पुन्हा अवकाळी पावसाने फटका दिला. अनेकांची पिके उगवण्याआधीच पावसात वाहून गेली. त्यामुळे नगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी अवकाळीचा धसका घेतला आहे.
आता गहू, हरभरा पिकांच्या काढणीवेळी अवकाळी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे परजिल्ह्यातील मजूर आणून शेतकरी आपली पिके काढून घेत आहेत.
गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने गहू- हरभऱ्याबरोबरच फळ पिकांत द्राक्ष, मोसंबी, संत्रा, आंब्याच्या कैऱ्यांचा शेतात सडा पडला. तर गहू, हरभरा, ज्वारीची पिके शेतातच आडवी झाली.
या आठवड्यातही हवामान खात्याने पुन्हा गारांच्या पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकरी चिंतेत आहेत. गहू, हरभऱ्याचे पीक काढणीला आले आहे. प्रत्येकजण पिके काढणीच्या कामात व्यस्त आहे. मजूर मिळत नाहीत.
शेजारच्या बीड, जालना, परभणी, सोलापूर भागांतील कामगार पीक कापणीसाठी शेतावर आणावे लागत आहेत.
त्या मजुरांचा प्रवास खर्च, राहण्याची, खाण्याची व्यवस्था करताना शेतकरी वर्गाच्या नाकी नऊ आले आहेत. अवकाळीच्या धसक्याने शेतकरी पैशांची उसनवारी करून पीक काढण्याच्या घाईत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.