
Nashik News : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Nashik District Central Cooperative Bank) थकबाकीदारांवर केल्या जात असलेल्या जप्तीच्या कारवाईविरोधात शेतकरी एकवटले आहेत. राज्य शासनाने नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला शेतकरी कर्जमुक्तीसाठी विषेश पॅकेज दिले पाहिजे.
तसेच जिल्हा बँकेने सहायक निबंधक यांच्यामार्फत होणाऱ्या सक्तीच्या वसुली कारवाईनुसार उताऱ्यावर नाव लावण्याची प्रक्रिया त्वरित थांबवण्यात यावी, अशा मागण्या घेऊन निफाड तहसील कार्यालयासमोर तालुक्यातील शेतकऱ्यांनी बुधवारपासून (ता. ५) उपोषण सुरू केले.
राज्य शासनाला आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी भाग पाडू, असा पवित्रा उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी घेतला आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे शेतकरी पूर्ण कर्जबाजारी झाला आहे. ‘आम्ही नादार झालो’, ही घेतली शपथ घेऊन ‘आम्ही घरी मरण्यापेक्षा सरकार दरबारी उपोषण करून मरू’ असा संताप शेतकऱ्यांनी नोंदवला.
तालुक्यातील पिंपळस रामाचे, उगाव, नांदुर्डी, दावचवाडी, रानवड, पालखेड, लोणवाडी सिद्ध पिंपरी अशा गावांमध्ये शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन संतप्त शेतकऱ्यांनी उपोषणाला बसण्याचा निर्धार केला होता.
निफाड उपबाजार आवरासमोर जमून शेतकरी तहसील कार्यालयात रॅलीद्वारे सहभागी झाले होते. त्यानंतर उपोषणाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी धरणे उपोषण सुरू केल्यानंतर सरकारने मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी केली आहे. अन्यथा गुरुवारपासून (ता. ६) बेमुदत उपोषण करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
जिल्हा बँकेने कर्ज घेतेवेळी शेतकऱ्यांकडून ५ टक्के शेअर कपात केला. त्याचे व्याज शेतकरी भरत आहे. शेअर्स रकमेत शेतकऱ्यांना कुठलाही लाभ मिळाला नाही. शासनाच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. कर्ज भरण्याची ऐपत राहिलेली नाही.
आसमानी-सुलतानी संकटामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यात जिल्हा बँकेची जमीन जप्ती लिलाव कारवाई त्यामुळे विशेष वसुली अधिकारी अनुषंगिक खर्च नावे टाकून शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम वाढवीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
उपोषणाला निफाडसह दिंडोरी, सिन्नर व नाशिक तालुक्यांतील शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत आहे. शेतकरी संघटना समन्वय समितीचे राज्य अध्यक्ष भगवान बोराडे, शेतकरी संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल, निफाड उपतालुकाध्यक्ष संजय पाटोळे, तुषार गांगुर्डे, दत्तात्रय सुडके, पुंजाराम कडलग, संजय झाल्टे, दत्तू गवळी, भाऊसाहेब भंडारे, बाळासाहेब भंडारे, अशोक शेवकर, अशोक भंडारे, मनीषा भंडारे, विनायक घोलप, गंगाधर शिंदे, हेमंत जाधव, सोमनाथ सहाणे, कलावती सहाणे, सोमनाथ आवारे, उमाकांत शिंदे, सदाशिव खेलूकर यांनी या आशयाचे निवेदन दिले आहे.
‘केजीएस’च्या ऊस पेमेंटचा मुद्दा पुन्हा समोर
निफाड तालुक्यातील के. जी. एस. कारखान्याला २०१८-१९ मध्ये शेतकऱ्यांनी ऊस दिला. मात्र त्याचे पेमेंट अद्याप मिळालेले नाही. ते शासनाने तत्काळ मिळवून द्यावे.
शेतीकर्जातून मुक्तता मिळावी व म्हणून शासनाने सदर कर्जाची जबाबदारी स्वीकारून शेअर्स प्रमाणात विशेष पॅकेज दिले पाहिजे, यासाठी शेतकऱ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.