
Amravati News : अमरावती जिल्ह्याची अंतिम आणेवारी ४६ पैसे आली असल्याने अमरावती जिल्हा (Amravati District) हा दुष्काळी जिल्ह्यांच्या यादीत आला आहे. मात्र शासनाला दुष्काळी जिल्ह्यासाठी असलेल्या सवलतींच्या घोषणा करण्याचा विसर पडला आहे. जूनपासून पुढील हंगामास सुरुवात होणार आहे.
अतिवृष्टी, संततधार पाऊस व पूरस्थितीमुळे खरीप हंगामात शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. गेल्या खरीप हंगामात जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावली. सप्टेंबर अखेरपर्यंत पावसाचा जोर कायम होता.
जिल्ह्यातील ८० महसूल मंडळातील पिकांना अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला. सोयाबीनसह मूग, उडीद ही पिके पार उद्ध्वस्त झालीत. तर, कापूस व तुरीलाही फटका बसला. साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांची नासाडी झाली.
खरीप हंगामाची जिल्हा प्रशासनाने अंतिम आणेवारी ४६ पैसे काढल्याने जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती आहे यावर शिक्कामोर्तब झाले. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने नुकसान भरपाईचे निकष बदलवत मदत जाहीर केली.
खरीप हंगामात उत्पादनावर परिणाम झाला हे शासनाने मान्य केले. खरीप हंगामात अमरावती जिल्ह्यातील चौदाही तालुक्याची आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आली आहे. त्यामुळे दुष्काळी जिल्ह्याच्या सवलती लागू होतील अशी साहजिकच अपेक्षा व्यक्त होत होती.
मात्र विधीमंडळाचे अधिवेशन आटोपले तरी सवलतींची घोषणा मात्र झाली नाही. त्यामुळे राज्य सरकारला या घोषणेचा विसर पडल्याचे दिसून आले आहे.
...या सवलती मिळतात
दुष्काळग्रस्त जिल्ह्यास शासनाकडून जमीन महसुलात सूट, विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करणे, रोजगार हमी योजनेची कामे वाढविणे, कृषिपंपाच्या देयक वसुलीस स्थगिती अशा सवलती दिल्या जातात.
तालुकानिहाय आणेवारी
अमरावती : ४६, भातकुली : ४७, तिवसा : ४७, चांदूररेल्वे : ४७, धामणगाव : ४६, नांदगाव खं. : ४७, मोर्शी : ४१, वरूड : ४३, अचलपूर : ४८, चांदूर बाजार : ४६, दर्यापूर : ४८, अंजनगाव : ४८, धारणी : ४७, चिखलदरा : ४७
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.