
Aurangabad Agriculture News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दरवर्षी एकरी १५ हजार रुपये अनुदान (Subsidy) देण्याची मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. औरंगाबाद जिल्हाध्यक्ष काशिनाथ हरिभाऊ वेताळ पाटील यांच्या नेतृत्वात याबाबत विभागीय आयुक्तांना सोमवारी (ता. २०) निवेदन देण्यात आले.
श्री वेताळ यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टी (Heavy Rain) व कधी पावसाचा मोठा खंड यासारख्या आपत्तीमुळे (Natural Calamity) दरवर्षी संकटात सापडत आहे. त्यावरही मात करून कष्टाने पिकविलेल्या शेती मालाला रास्त भाव मिळत नाही.
त्यामुळे घेतलेल्या कर्जाची तो परतफेड कर शकत नाही. नुकसानीच्या (Crop Damage) हमीसाठी घेतलेल्या पीक विम्याची रक्कम ही त्याला मिळत नाही.
शेतीसाठी लागणाऱ्या खर्चात तीन ते चार पट वाढ झाली आहे. परंतु कापसासारखे नगदी पीक बाजारभाव नसल्यामुळे मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. सिंचनाची व्यवस्था नाही. मराठवाड्याचे सिंचन १२ टक्क्यापुढे जात नाही.
८८ टक्के शेतकरी कोरडवाहू असून पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. चोहोबाजूंनी घेरलेल्या संकटामुळे हतबल होऊन शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे निवेदनात नमूद आहे.
त्यामुळे शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखण्यासाठी तेलंगना सारख्या छोट्या राज्याचा आदर्श घेऊन सिंचनाची व्यवस्था वाढून प्रत्येक शेतकऱ्यांना दरवर्षी १५ हजार रुपयाची मदत द्यावी, म्हणजे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही.
याप्रकरणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालून हे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष कैलास तवार, जिल्हाध्यक्ष काशिनाथ पाटील वेताळ,सुनील पाटील जाधव, जगन्नाथ पाटील काकडे आदींनी केली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.