
Crop Damage Help : मार्च महिन्यात अवकाळी पावसाने नुकसान झाले असताना आता एप्रिल मध्येही आठ एप्रिलपासून मुसळधार पावसाने शेतीपिकांचे नुकसान (Crop Damage) झाले आहे. मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात मोठे नुकसान झाले आहे.
गारपिटीने नुकसान झालेल्या शेतीपिकांसाठी हेक्टरी ५० हजार रुपये व फळबागांसाठी हेक्टरी एक लाख रुपयांची मदत तातडीने जाहीर करा, अशी मागणी करणारे पत्र विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांना सह्याद्री अतिथीगृह येथे बुधवारी भेट घेऊन दिले.
या पत्रात मार्च व एप्रिल महिन्यात अवकाळी व गारपिटीमुळे झालेल्या पशूधनाच्या व घरांच्या नुकसानीसाठी ‘एनडीआरएफ’च्या निकषाच्या दुप्पट मदत जाहीर करावी.
वीज पडून मृत्युमुखी पडलेल्यांच्या व पारस येथील दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना एनडीआरएफमधून ४ लाख व मुख्यमंत्री मदत निधीतून ६ लाख रुपयांची मदत करावी.
निर्यातक्षम द्राक्ष बागायतदार तसेच बेदाणा प्रक्रिया उद्योगांना भरीव मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
२७ मार्च २०२३ च्या नवीन आदेशामुळे दुप्पट मदतीचा निर्णय बदलून एनडीआरएफच्या जुन्या निकषात मामुली वाढ केलेली आहे. या नवीन आदेशाचा फेरविचार करुन एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट मदतीबाबतचा निर्णय सरकारने घ्यावा, असे देखील अजित पवार म्हणाले.
तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या
दरम्यान, गारपिटीमुळे गहू, हरभरा, कांदा, उन्हाळी मूग, कोकणातील आंबा, काजू, कोकम, जांभूळ या पिकांना फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास लागोपाठ आलेल्या अवकाळीने हिरावून घेतल्याने शेतकरी खचून गेला आहे.
शेतीसाठी केलेला खर्चदेखील निघेल की नाही अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. त्यामुळे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.