Varieties Of Cotton : कापसाच्या विविध जातींचा रंजक इतिहास माहितेय का?

लांब धाग्याचा कापूस भारतात मुख्यतः इजिप्तमधून येतो. वरलक्ष्मी वाण आल्याने इजिप्तमधून होणारी कापसाची आयात बंद पडायला पाहिजे होती, पण तसे काही झाले नाही. कारण लांब धाग्याचा कापूस ही भारताच्या उपयोगाची इजिप्तमधील एकमेव वस्तू होती.
Cotton Varieties
Cotton VarietiesAgrowon

डॉ. आनंद कर्वे

Cotton Varieties : जगाला अनेक वर्षे कापूस (Cotton) पुरवला जायचा तो भारतातून. जागतिक कापूस पुरवठ्यात (Cotton Supply) भारताचा मोठा दबदबा राहिला. अमेरिकेतील गॉसिपियम हिर्सुटम आणि गॉसिपियम बार्बाडेन्सी या कापसाच्या जातींची (Cotton Varieties) जगाला माहिती होईपर्यंत जगात जे सुती कापड वापरले जाई ते भारतातल्या कापसापासून बनलेले असायचे.

भारतातील देशी किंवा जरिला कापूस (गॉसिपियम हर्बेशियम) आणि देवकापूस (गॉसिपियम आर्बोरियम) या जातींच्याच सुतापासून हे कापूस (Cotton) बनविले जात असे.

इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाल्यावर सूत काढणे आणि कापड विणणे ही कामे यांत्रिक पद्धतीने होऊ लागली. त्यासाठी लागणारा कापूस भारतासह इजिप्त, सूदान व अमेरिकेतून येत असे. पुढे मुंबईत कापड गिरण्या निघाल्या.

विदर्भात गॉसिपियम हिर्सुटम या अमेरिकन कापसाचे चांगले उत्पन्न येते असे आढळून आल्याने विदर्भात कापूस शेती चांगलीच फोफावली. गेल्या शतकात भारतातला एक ततीयांश कापूस एकट्या महाराष्ट्रात पिकत असे; तो विदर्भातल्या कापसामुळेच.

महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यापासून नाशिक जिल्ह्यातील मनमाडपर्यंतचा दक्षिणोत्तर पट्टा हा दुष्काळी भाग आहे. येथे नैर्ऋत्य मॉन्सूनचा पाऊस फारच माफक, म्हणजे एकूण फक्त १५० मिमी पडतो. तोही बेभरवशाचा असतो.

हमखास पडणारा पाऊस म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबरमधला ईशान्य मॉन्सूनचा पाऊस. पण तोही फक्त सुमारे २५० ते ३०० मिमी एवढाच असतो. या दुष्काळी प्रदेशाला सह्याद्रीमधील धरणांतले पाणी कालव्यांवाटे पुरविले जाते; म्हणून या भागाला डेक्कन कॅनाल्स रिजन (Deccan Canals Region) असेही म्हटले जाते.

Cotton Varieties
Cotton Market : कापूस दरवाढीला पोषक स्थिती असतानाही दबावातच का?

जेव्हा कालव्याच्या पाण्याची सोय नव्हती तेव्हा या भागात फक्त रब्बी ज्वारी, करडई किंवा जवस अशी काही मोजकीच पिके घेतली जात. पण कालव्यांचे पाणी मिळू लागल्यापासून या दुष्काळी भागात भाजीपाला, ऊस, द्राक्षे, भुईमूग, गहू, चाऱ्याची पिके, फळे इ. पिके घेण्यात येऊ लागली.

पूर्वी सोलापूर जिल्ह्यात देशी जरीला कापसाची ऑगस्टमध्ये लागवड केली जाई. रब्बी हंगामात बोंड अळी या किटकाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणावर होतो. तसेच देशी कापूस बोंड आळीला कमी प्रमाणात बळी पडतो. त्यामुळे या पिकापासून शेतकऱ्यांना थोडेफार उत्पन्न मिळे.

Cotton Varieties
Cotton Rate : अमरापूर येथे विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

फलटणच्या निंबकर सीड्‍स कंपनीने १९६७-६८ मध्ये कर्नाटकात लक्ष्मी या नावाने लोकप्रिय झालेले अमेरिकन कपाशीचे (गॉसिपियम हिर्सुटम) वाण डेक्कन कॅनाल्स भागात आणले. एप्रिल महिन्यात कालव्याचे पाणी देऊन पेरणी केल्यास सप्टेंबर महिन्यातील मोठ्या पावसाच्या आत या पिकाच्या बहुतेक सर्व वेचण्या पूर्ण होत असत.

एप्रिल आणि मे या महिन्यांमधल्या कडक उन्हाळ्यामुळे कीटकांचा प्रादुर्भाव कमीच असायचा. पावसाळ्यात पाऊसमान अत्यंत कमी असल्याने फवारलेली कीटकनाशके पावसाने धुतली जाण्याची शक्यताही फार कमी असे. त्यामुळे लक्ष्मी वाणापासून हेक्टरी २५ क्विंटल कापूस सहज मिळायचा. हा कापूस संपूर्ण भारतात सर्वप्रथम बाजारात येत असल्याने त्याला भावही चांगला मिळत असे.

लक्ष्मी कपाशीचे बी कर्नाटकातून आणावे लागे; पण पुढे महाराष्ट्र सरकारने परप्रांतातून कपाशीचे बी आणण्यावर काही निर्बंध घातले. त्यामुळे निंबकर सीड्सचा लक्ष्मी कपाशीचे बी विकण्याचा धंदा बंद पडला.

श्री. निंबकर यांनी उच्च न्यायालयात लढा देऊन सरकारला हे निर्बंध मागे घ्यायला लावले. पण त्यातून शहाणपणा शिकून त्यांनी आपली स्वतःची निंबकर कापसाची वाणे निर्माण केली. या वाणांचे आयुष्य लक्ष्मीपेक्षा कमी असूनही उत्पन्न अधिक येई. परंतु ही वाणे डेक्कन कॅनॉल्स भागातच चांगली ठरली.

१९७० ते १९८० या दशकात कापसाची संकरित वाणे निघाली. गुजरातमधील शास्त्रज्ञ डॉ. चंद्रकात पटेल यांनी हिर्सुटम कपाशीच्याच दोन वाणांच्या संकरातून निर्माण केलेल्या एच-४ या वाणाने संकरित कपाशीची सुरुवात झाली.

संकर करण्यासाठी एका वाणाच्या फुलातले पूंकेसर हाताने काढून टाकले की त्याचे मादीवाण होई. आणि दुसऱ्या वाणाचे परागकण वापरून हातानेच त्याचे परागीकरण केले की त्यापासून संकरित बीज मिळायचे. हाताने संकर करून तयार केलेले हे बी महाग असे; पण त्याचे उत्पन्न चांगले येत असल्याने ते अल्पावधीतच लोकप्रिय झाले.

याच सुमाराला वरलक्ष्मी नामक लांब धाग्याच्या कापसाचेही एक संकरित वाण आले. हे वाण अमेरिकन कापसाच्याच हिर्सुटम आणि बार्बाडेन्सी या दोन भिन्न जातींच्या संकरातून निर्माण केले होते.

लांब धाग्याचा कापूस भारतात मुख्यतः इजिप्तमधून येतो. वरलक्ष्मी वाण आल्याने इजिप्तमधून होणारी कापसाची आयात बंद पडायला पाहिजे होती, पण तसे काही झाले नाही. कारण लांब धाग्याचा कापूस ही भारताच्या उपयोगाची इजिप्तमधील एकमेव वस्तू होती.

त्यामुळे इजिप्त आणि भारत यांच्यातील व्यापार चालू ठेवण्यासाठी भारताला इजिप्तकडून कापूस घेण्यावाचून गत्यंतरच नव्हते. आणि दुसरे कारण म्हणजे भारतातला कापडउद्योग इतका वाढला होता, की त्याची गरज भागविण्यासाठी परदेशातून कापूस आयात करावाच लागतो.

भारतात अमेरिकी कापूस आल्यापासून देशी कापूस आणि देवकापूस या दोन भारतीय जातींचे महत्त्व कमी होत गेले. एकेकाळी प्रसिद्ध असलेली ढाक्क्याची मलमल देवकापसापासूनच केली जायची.

पण देवकापूस बहुवर्षीय असल्याने आणि त्याची शेतात लागवड केली जात नसल्याने तो दुर्लक्षिला गेला. हा कापूस परसदारात वाढवला जातो. हा कापूस हल्ली फक्त समई आणि निरांजनाच्या वातींसाठी वापरला जातो.

पण शेताची दरवर्षी नांगरट करून दरवर्षी नव्याने बी पेरण्याची गरज नसल्याने तमिळाडूतील कोइमतूर येथील जी. डी. नायडू नामक एका उद्योगपतीने चार एकरांवर देवकापूस लावून त्याची प्रायोगिक राई निर्माण केली होती. फारशी मशागत न करताही या कापसाचे प्रति हेक्टर चांगले उत्पन्न येते, हे त्यांनी दाखवून दिले होते.

Cotton Varieties
Farmer agitation: मराठवाड्यातील शेतकरी उतरले रस्त्यावर; कुणी बैलगाडीत तर कुणी कापूस रस्त्यावर टाकत पुकारले आंदोलन

माझ्या माहितीप्रमाणे देवकपाशीवर दुसरे महत्त्वाचे काम मध्यप्रदेशात डॉ. झुल्का नामक शास्त्रज्ञाने केले होते. त्याने देवकपाशीवर एच-४ या वाणाचे कलम करून एच-४ या वार्षिक वाणाचे बहुवार्षिक वाणात रूपांतर केले.

वृक्षतोडीने उजाड झालेल्या जंगलात त्याने ही कलमे लावली. तिथले आदिवासी ज्याप्रमाणे जंगलातील इतर झाडांपासून काही ना काही उत्पन्न मिळवतात त्याप्रमाणेच त्यांना या कलमांपासून कापसाचे उत्पन्न मिळू लागले. अर्थात ही दोन्ही उदाहरणे प्रायोगिक कामांची आहेत. त्यातून पुढे काही निष्पन्न झाले की नाही हे मला समजले नाही.

कापूस म्हणजे नेमके काय?

सरकीवर असणाऱ्या सेल्युलोजमय तंतूंना आपण कापूस म्हणतो. खरे तर अनेक वनस्पतींच्या बियांवर असे तंतू असतात आणि त्यांच्यामुळे त्या बिया वाऱ्याने दूर नेल्या जातात. पण सरकीवरील तंतूंची रचना ते बीज वाऱ्याने दूर नेले जाईल अशी नसते. मग या तंतूंचा कपाशीला उपयोग तरी काय असावा?

यासंबंधी माझे मत पुढीलप्रमाणे आहे. मी प्रयोग करून असे दाखवून दिले आहे की बी रुजून येण्यापूर्वी जर आपण जमिनीतल्या सूक्ष्मजंतूंना एखादा कार्बनचा स्रोत पुरविला, तर मातीतल्या सूक्ष्मजंतूंची संख्या वाढते.

मातीत सूक्ष्मजंतूंची संख्या जेवढी अधिक, तेवढी त्या मातीची सुपीकताही अधिक असते, असा कृषिशास्त्राचा नियमच आहे. त्यानुसार अशा मातीत रुजून येणारी रोपे अधिक जोमदार असतात. म्हणून माझ्या मते जमिनीतले सूक्ष्मजंतू सरकीवरील सेल्युलोजमय तंतू खाऊन आपली संख्या वाढवतात आणि जमिनीची सुपीकताही वाढवतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com