
Nanded news : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी कुंडलवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या कर्जमाफीचा विषय विधानसभेत लक्षवेधीव्दारे उपस्थित केला.
यावर तालिका अध्यक्षांनी या प्रकरणी पुढील आठवड्यात बैठक घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, असे निर्देश सहकार मंत्री अतुल सावे (Cooperation Minister Atul Save) यांना दिले.
सभासद शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सिंचनासाठी कुंडलवाडी, शेळगाव, चन्नापूर आणि पाटोदा आष्टी अशा दोन उपसा जलसिंचन योजनांचे काम १९८५ मध्ये सुरू झाले होते.
या योजनेकरिता नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दोन कोटी पाच लाख रुपयांचे कर्ज दिले होते व त्याचा बोजा संबंधित ५६९ शेतकरी सभासदांच्या सातबार्यावर चढविण्यात आला होता.
१९९४ मध्ये ही योजना पूर्ण झाली मात्र, उपसा सिंचन कार्यान्वित होऊ शकले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना योजनेचा कोणताही लाभ मिळाला नाही. दरम्यानच्या काळात जिल्हा बँकेने दिलेल्या कर्जावर व्याज आकारणी सुरू होती.
त्यामुळे हे कर्ज आता व्याजासह १० कोटी रुपयांच्या घरात पोहोचले आहे. २०१४ मध्ये हा विषय विधानसभेत आला असता तत्कालीन सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा बँकेमार्फत व्याजमाफीचा प्रस्ताव मागवून घेऊ आणि मुद्दलाची रक्कम राज्य सरकार देईल, असे आश्वासन दिले होते.
मात्र, मागील ९ वर्षात या आश्वासनाची पूर्तता झाली नाही. राज्य सरकारने मुद्दलाची रक्कम दिल्यास व्याज माफ करण्याचा ठराव जिल्हा बँकेने दोन वेळा केला आहे.
तरीही मंत्र्यांनी सभागृहात दिलेले आश्वासन पाळले जात नसेल तर ती अतिशय गंभीर बाब आहे, याकडे अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्षांचे लक्ष वेधले.
त्यानंतर तालिका अध्यक्षांनी या प्रकरणी पुढील आठवड्यात बैठक घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, असे निर्देश सहकार मंत्री अतुल सावे यांना दिले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.