
हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव (ता. वसमत) तसेच परिसरात बुधवारी (ता. ८) दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस (Heavy Rain) झाला. या परिसरातील अनेक गावांतील शेकडो एकरांवरील केळी बागा (Banana Orchard) वादळामध्ये मोडून पडल्या आहेत. केळी उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
बुधवारी (ता. ८) दुपारी चारनंतर गिरगाव परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वादळामुळे गिरगाव, खाजनापूर वाडी, परजना, सोमठाणा, कुरुंदा, पार्डी, वडगाव आदींसह अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या शेतातील केळीची संपूर्ण झाडे मोडली.
सध्या केळीचे दर वधारले आहेत. प्रतिक्विंटल २००० रुपये पर्यंत दर मिळत आहे. या भागातील शेतकऱ्यांचे परिपक्व झालेल्या तसेच काढणीस आलेल्या केळीचे पीक वादळामुळे शेतकऱ्यांच्या हातचे गेले आहे. खरिपाच्या पेरणी हंगामात मोठा आर्थिक फटका बसला आहे. गिरगाव येथील भाऊराव नादरे, गणेश नादरे, गंगाधर नादरे, माणिकरान दाळपुसे आदींसह अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागाचे मोठे नुकसान झाले.
बालाजी नादरे, सोपान पितळे यांच्या पपईचे नुकसान झाले. वादळामुळे आखाड्यांवरील निवारे गावातील घरांवरील पत्रे उडाले. विविध प्रकारचे वृक्ष मोडून पडले. विजेचे लोखंडी खांब वाकले त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. केळी पीक नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.