
Nashik Agriculture Damage News : सटाणा तालुक्यातील एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी तातडीने पंचनामे (Crop Damage Survey) करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असतानाही तालुका प्रशासनाकडून बाधित पिकांचे पंचनामे करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करून शेतकऱ्यांना अडचणीत आणले जात आहे.
शासकीय अधिकाऱ्यांनी दिरंगाई न करता अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी तातडीने सरसकट पंचनामे करावेत यांसह विविध मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या संतप्त शेतकऱ्यांनी बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. १७) तहसील कार्यालयात तासभर ठिय्या आंदोलन केले.
दरम्यान, उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन तत्काळ कार्यवाहीचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
सकाळी माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी ‘सरसकट पंचनामे झालेच पाहिजे’, ‘बळीराजाला नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे.
या मागण्यांसह प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत तहसीलदारांच्या दालनात ठिय्या दिला. आंदोलनाची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे यांनी तत्काळ तहसील कार्यालय गाठून शेतकऱ्यांची भेट घेतली.
संकटाच्या काळात प्रशासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अडचणीत आणले जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. तालुक्यात सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करावेत आणि जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी तालुक्यातील तलाठी, कृषी अधिकारी, ग्रामसेवक यांना पंचनामे करण्यात दिरंगाई करू नये याबाबत कडक सूचना देण्याची मागणीही चव्हाण यांनी केली.
या वेळी राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष संजय पवार, जिभाऊ सोनवणे, यशवंत कात्रे, रत्नाकर सोनवणे आदी शेतकऱ्यांची भाषणे झाली.
आंदोलनात पांडुरंग सोनवणे, माधव सोनवणे, हिरामण गांगुर्डे, हितेंद्र बागूल, ज. ल. पाटील, शेखर सोनवणे, राजेंद्र सोनवणे, भास्कर सोनवणे, बापू येवला, रमेश सोनवणे, अनिल कापडणीस, हरिभाऊ खैरनार, सुभाष पाटील, राजेंद्र पवार, आकाश सोनवणे, स्वप्नील सोनवणे, निंबा सोनवणे, शिवाजी सोनवणे आदींसह शेतकरी सहभागी होते.
आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्या
- पीककर्ज, कृषी पंपांची थकित बिले माफ करावीत.
- नुकसानग्रस्त फळबागांसाठी हेक्टरी दोन लाख रुपये अनुदान द्यावे.
- मागीलवर्षी काढलेल्या पीकविम्याची रक्कम त्वरित मिळावी.
- कांदा अनुदानासाठी सात-बारायावर पिकाची नोंद असलेली अट रद्द करावी.
- द्राक्ष उत्पादकांना द्राक्ष बागांबरील प्लॅस्टिक आच्छादनासाठी १०० टक्के अनुदान द्यावे.
- गारपीट झालेल्या भागामध्ये तीन वर्षे काही उत्पन्न निघणार नसल्यामुळे बाधीत शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज घोषित करावे.
- पाऊस व गारपीट झालेल्या गावांमध्ये तत्काळ सरसकट पंचनामे करावेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.