
Subsidy Satara News : अनेकवेळा अनुदानापोटी लागणारा निधी उपलब्ध होऊनही शेतकऱ्यांपर्यंत पोहण्यास विलंब होत असल्याने त्यांच्यात नाराजी निर्माण होते. मात्र, यावेळी कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन करून शासनाकडून आलेला दोन कोटी रुपयांचा निधी अवघ्या चार दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला आहे. खरिपाच्या तोंडावर अनुदान जमा केल्यामुळे शेतकऱ्यांना मदत होणार आहे.
जिल्ह्यात २०२२-२३ वर्षात अनुदानासाठी सात हजार ८८३ शेतकरी या योजनेतील सोडतीत पात्र ठरले होते. त्यामधील १ हजार ३८९ लाभार्थी शेतकऱ्यांना मार्चअखेर तीन कोटी ८६ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले.
मात्र, या ठिबक संच घेऊनही अनुदान मिळण्याच्या यादीत जिल्ह्यातील १ हजार १०८ शेतकरी प्रतीक्षेत होते. खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा लागली होती. हे अनुदान देण्यासाठी शासनाकडून ९ मे रोजी कृषी विभागाला दोन कोटी एक लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता.
खरीप हंगाम तोंडावर आल्याने या निधीतून लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्परतेने अनुदान जमा करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला. यासाठी कृषी विभागाकडून सुक्ष्म नियोजन करून युद्धपातळीवर मोहीम राबविली. त्यामुळे अवघ्या चार दिवसांत ६७६ लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर २ कोटींचा निधी वर्ग करण्यात आला.
यामुळे शेतकऱ्यांची अनुदानाची प्रतीक्षा संपलेली आहे. दरम्यान, प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेतील लाभधारक ४९८ शेतकऱ्यांना अनुदान द्यावे लागणार आहे. त्यासाठीही शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.