
Alibaug Mango Damage News : वाढते तापमान, बदलते हवामान, अवकाळी पावसामुळे रायगड जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. दुसऱ्या टप्प्यातील देशांतर्गत व देशाबाहेर निर्यात होणाऱ्या आंब्यावरही परिणाम झाला आहे. मागणी अधिक परंतु पुरवठा कमी अशी परिस्थिती आंबा उत्पादक शेतकऱ्यांची झाली असून त्यांच्या उत्पन्नही घटले आहे.
जिल्ह्यामध्ये भात शेतीबरोबरच आंब्याची लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात. जिल्ह्यात सध्या आंब्यांचे क्षेत्र १४ हजार हेक्टर आहे. त्यात सुमारे १२ हजार ५०० हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र आहे. लाखो शेतकरी आंब्याची लागवड करून आर्थिक उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करतात.
आंब्याचे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभागाकडूनही पुढाकार घेतला जात असून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. आंबा लागवडीसाठी शेतकऱ्यांना रोपे देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
यंदा थंडीचा हंगाम मोहरासाठी पोषक असल्याने पहिल्या टप्प्यातील आंबा चांगला तयार झाला होता. फेब्रुवारीपासून आंब्याची बाजारापेठेत आवक सुरू झाली. मात्र बदलत्या हवामानाचा फटका उत्पादनावर बसला. मार्च, एप्रिल, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळीने जिल्ह्यातील आंबा उत्पादक हवालदील झाले आहेत.
दुसऱ्या टप्प्यातील आंबा पंधरा मेपासून बाजारात येण्यास सुरुवात होईल, मात्र केवळ १८ टक्केच आंबा बाजारात येण्याची शक्यता आहे. आंब्याला एका पेटीमागे १४०० ते १५०० रुपये भाव मिळत असला, तरीही पुरवठा कमी असल्याने आर्थिक फटका बसण्याची शक्यता असल्याचे आंबा उत्पादकांकडून सांगण्यात येत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.