
Mumbai News : आंब्याला चांगला मोहर आल्याने यंदा बागायतदार खूष होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे मोहोर गळण्याचा प्रकार वाढला आहे. तर काही ठिकाणी आंब्यावर बुरशीजन्य रोगाची लागण होत आहे.
अवकाळी पाऊस पडला तर मोठे नुकसान होण्याची चिंता बागायतदारांना सतावत आहे. यंदा आंबा पीक उशिरा येणार असून गतवर्षीपेक्षा ३० ते ४० टक्के उत्पादन घटणार असल्याची स्थिती आहे.
मुरुड तालुक्यात १,५९० हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड होत असली तरी १,४१० हेक्टर क्षेत्र उत्पादन क्षम आहे. त्यातून २०२० मध्ये निसर्ग चक्रीवादळाने ६५० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. अस्मानी संकटामुळे नवीन लागवड क्षेत्र वाढलेले नाही.
लहरी वातावरणामुळे वर्षाआड आंब्याचे पीक हाती येत असल्याची चिंता आहे. तालुक्यातील साळाव, वळके, भोईघर, शिरगाव, आगरदांडा, सावली या भागात मोठ्या प्रमाणावर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. सध्याच्या वातावरणात मोहोर दिसत असला तरी तो फुलणारा नसल्याचे शेतकरी सांगतात.
कोकणात पारंपारिक हापूस आंबा लागवड डोंगर उतारावर तसेच वरकस पडीक जमिनीवर केली जाते. थोडी आम्लयुक्त जमीन आंबा वाढीसाठी पोषक ठरते. पारंपरिक हापूसऐवजी रत्ना, सिंधू, पायरीसारख्या अन्य प्रजातीही विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
जुन्या झाडांपासून उत्पादन कमी येत असल्याने बागांचे वेळोवेळी छाटणी होणे गरजेचे आहे. कृषी विभागाकडून हापूस आंबा क्षेत्र विस्तारीकरणासाठी जागृती केली जाते. परंतु अत्यल्प भूधारकांची संख्या अधिक असल्याने जमीन धारणा क्षेत्र मुळातच कमी उपलब्ध आहे.
त्यामुळे लाभार्थी पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. मोहोर संरक्षण उपाययोजना प्रभावीपणे राबविली जात नसल्याने बागायतदारांना फटका बसत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.