पुणेः भारताची चीनला तांदूळ निर्यात (Rice Export) वाढली आहे. यंदा जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान भारतानं चीनला तांदूळ पुरवठा करण्यात व्हिएतनामला मागे टाकले. यंदा चीनला तांदळाचा पुरवठा (Rice Supply) करणारा प्रमुख देश म्हणून भारत पुढं आला आहे. मात्र 9 सप्टेंबर रोजी केंद्र सरकारने तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे पुढील काळात निर्यात कमी होऊ शकते.
चीनच्या जनरल ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ कस्टम्सच्या मते, यावर्षी चीनच्या तांदूळ आयातीत (Chine Rice Import) ४२.५ टक्क्यांनी वाढ झाली. जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत चीनने ४.५६ दशलक्ष टन तांदूळ आयात आली आहे. मात्र या आयातीचं मूल्य ११.५ टक्क्यांनी घटलं आहे. मागच्या वर्षी याच कालावधीत चीनने ३.२ दशलक्ष टन तांदळाची आयात केली होती. २०२० च्या तुलनेत ही आयात दीड पटीने जास्त होती. चीनने तुकडा तांदळाची (Broken Rice) आयात सर्वाधिक केल्याचं दिसतं. कारण या तांदळापासून नूडल्स आणि पशुखाद्य तयार केलं जातं.
चीनच्या या आयातीवर तिथल्या प्रसारमाध्यमांनी बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्यांनी म्हटल्याप्रमाणे, चीनमध्ये तांदळाचा मुख्य अन्नात समावेश होत असल्याने तांदळाची आयातही जास्त होते. पण काही व्यापार विश्लेषकांनी म्हटल्याप्रमाणे, जागतिक बाजारपेठेत तांदळाचे दर उतरल्यामुळे चीनने सर्वाधिक आयात केल्याचं दिसतं. जूनपासून चीनमध्ये उष्णतेच्या झळा जाणवायला सुरुवात झाली होती. सोबतच उष्णतेच्या लाटेमुळे जगभरात अन्नधान्याचं उत्पादनही घटल्याचे चित्र समोर होते. त्यामुळे चीनने जुलैमध्ये ७० टक्क्यांनी तर ऑगस्टमध्ये ३४.८ टक्क्यांनी तांदळाची आयात वाढवली.
चीनच्या कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, जिआंगसू आणि अनहुई या दक्षिण चिनी प्रांतातील भात पीक उष्णतेच्या लाटेला बळी पडलं आहे. आतापर्यंत भाताच्या ११.३ दशलक्ष हेक्टरपैकी केवळ १५ टक्के पिकाची काढणी झाली आहे. त्यामुळे चीनमध्ये तांदळाचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे. अपेडाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षातील एप्रिल-जुलै या कालावधीत चीनने भारतातून सर्वाधिक तांदूळाची आयात केली होती. चीनने या कालावधीत जलपास १.०७ दशलक्ष टन तांदळाची खरेदी केली होती. या तांदळाच्या आयातीचे मूल्य १.९० अब्ज डॉलर इतके होते.
चीनच्या जनरल ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ कस्टम्सने (GAC) प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार, चीनने ऑगस्टमध्ये ४.८ लाख टन तांदूळ आयात केला होता. जुलैमध्ये ही आयात ५ लाख टनांच्या आसपास होती. व्हिएतनामच्या मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटल्याप्रमाणे, व्हिएतनामने चीनला तांदूळ निर्यात करणारा अव्वल देश म्हणून आपला दर्जा गमावलाय. यामागे कारण होत ते ग्लुटिनस तांदूळ. चीनने या तांदळाची आयात कमी केल्यामुळे व्हिएतनाममधून तांदळाची निर्यात ही घटल्याचं दिसून आलं.
पण आता बिगर बासमती आणि तुकडा तांदूळ निर्यात करण्यावर अंकुश आणल्याने परिस्थिती बदलण्याची चिन्ह आहेत. चीनने आत्तापर्यंत जी तांदळाची आयात केली होती, त्यात ९० टक्क्यांहून अधिक तुकडा तांदूळ होता. सरकारने तांदळाच्या निर्यातीवर अंकुश लावला असला तरी देशातील अन्नधान्याच्या किंमती वाढू नयेत यासाठी प्रयत्न केले आहेत. सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न (PMGKAY) योजनेत तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या योजनेंतर्गत दारिद्रयरेषेखालील लोकांना मोफत धान्य पुरवठा केला जातो.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आता तीन महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली असून या योजनेची मुदत आता ३१ डिसेंबरपर्यंत असणार आहे. भारताने तांदळाच्या निर्यातीवर अंकुश लावल्यामुळे चीनने 2022-23 या वर्षात तांदूळ आयातीत ५ लाख टन कपात केली असल्याची माहिती अमेरिकेच्या कृषी विभागाने (USDA) दिली आहे. तसेच भारतातून बसमातीसह इतर तांदळाची निर्यात २० दशलक्ष टनांनी घटली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.