
Solapur News : सांगोला तालुक्यातील काही गावांमध्ये कामे न करताच ठेकेदाराला देयके अदा केल्याच्या आरोपाची चौकशी पूर्ण झाली आहे. चौकशी समितीच्या या अहवालात संबंधित अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे.
तसेच बेकायदेशीररीत्या कामांना मान्यता दिल्याचे निदर्शनास आले आहे. या चौकशीवर आता ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा (Rural Water Supply Department) अभिप्राय घेण्यात येणार असून, या अभिप्रायानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
जलजीवन मिशनच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाबा कारंडे यांनी केली होती. तत्कालीन कार्यकारी अभियंता दीपक कोळी व उपअभियंता कमळे यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर कोळी यांची बदली झाली होती.
तसेच या सगळ्या पार्श्वभूमीवर त्या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीस स्वामी यांनी कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, लेखा अधिकारी कैलास कुंभार, पाणी व स्वच्छता विभागातील सचिन सोनकांबळे यांची त्रिसदस्यीय समिती चौकशीसाठी नेमली होती.
आता या समितीची चौकशी पूर्ण झाली असून, समितीच्या या अहवालात काही गंभीर बाबी समोर आल्या आहेत. ग्रामपंचायत स्तरावर चर्चेशिवाय बिले अदा करू नये, या अटीचे उल्लंघन करण्यात आले आहे.
तसेच टेंडर अटीमध्ये ६० टक्के बिल अदा करण्याची अट असताना ८० टक्के बिले अदा केली गेली आहेत. त्याही अटीचे पालन झालेले नाही.
एकाच ठेकेदाराकडे सगळी रक्कम
जलजीवन मिशनच्या कामासाठी भरण्यात आलेल्या निविदा या ठेकेदार आणि अधिकारी यांनी मॅनेज करून भरल्या आहेत. एका कामासाठी दोन जणांनी कामासाठी निविदा भरल्या तर ते काम रद्द होते, काम घेण्यासाठी एकाच ठेकेदारांनी तीन ठेकेदारांची रक्कम भरली आहे.
तसेच ज्या मूळ ठेकेदाराला काम मिळाले आहे. त्याच्याच खात्यावर इतर दोन ठेकेदारांची रक्कम जमा करण्यात आल्याचे यात उघड झाले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.