
महाराष्ट्रात जिथे बागायतीची (Irrigated Land) सोय झाली तेथे ऊस शेती (Sugarcane Farming) वाढली. हे चित्र घाटमाथ्यापासून देशावरील कमी पावसाच्या प्रदेशापर्यंत सर्वत्र दिसून येते. ऊस हे जमिनीत दीर्घकाळ राहणारे पीक. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्याच्या काळात सर्वांत जास्त जैवभार तयार करणारे पीक. यामुळे एका पिकाच्या कालावधीत सर्वांत जास्त सेंद्रिय कर्ब (Organic Carbon) संपविणारे पीक.
सुरुवातीच्या काळात जमिनीत नैसर्गिक सेंद्रिय कर्बाचे प्रमाण उत्तम होते तोवर सर्वत्र उत्पादन पातळी चांगली मिळाली. बागायतीची सोय झाल्यानंतर १५ ते २० वर्षांच्या काळात उत्पादन पातळी खाली येऊ लागली. ही उतरती कळा लागण्याचा वेग इतका सावकाश होता, की ही गोष्ट नेमकी कोणी फारशी गंभीरपणे घेतली नाही. इथे उत्पादन पातळी घटीची शास्त्रीय कारणे शोधण्याऐवजी संसाधनांचा वापर जास्त-जास्त करण्याकडे शेतकरी गुंतला गेला.
उत्पादन खर्च वाढला, मिळणारे उत्पन्न कमी होत गेले, तरी उसाखालील क्षेत्र सालोसाल वाढत आहे. उसाला भाव (एफआरपी) मिळण्याची हमी असल्यामुळे शेतकऱ्यांचा उसाकडे ओढा असतो. सर्वत्र पाऊस भरपूर झाल्यास उत्तर व मध्य महाराष्ट्रातील ऊस क्षेत्र इतके वाढते, की ते मे अखेर कारखाने चालू ठेवूनही संपत नाही. सालोसाल एकाच जमिनीच्या तुकड्यात उसाचीच लागवड केली गेल्याने जमिनीच्या सुपीकतेची प्रचंड हानी होत आहे. यावर फारशी चर्चा होत नाही.
पीक उत्पादनावर परिणाम करणारे घटक
सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी अजूनही शेणखत, कंपोस्ट वापराबाबत शिफारस करण्यात येत आहे. याचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते, यावर फारशी चर्चा होत नाही. कृषी खात्याच्या शिफारशी आणि प्रत्यक्ष शेतीतील वास्तव यांचा काही समन्वय आहे की नाही, असा प्रश्न उभा राहतो.
सेंद्रिय खत व्यवस्थापन हा विषय खूप मर्यादित मांडला जातो. सेंद्रिय खत हा पीक उत्पादनात जसा एक महत्त्वाचा घटक आहे, तसे पिकाच्या उत्पादनावर जमिनीत अनेक घटक काम करीत असतात. यात जमिनीचा सामू, क्षारता व सेंद्रिय कर्बाची टक्केवारी हे तीन महत्त्वाचे घटक आहेत; परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यांना या शास्त्रीय शब्दांचा अर्थ समजावून सांगणे ही सर्वांत अवघड गोष्ट आहे.
सॉईल हेल्थ कार्डच्या मर्यादा
जमिनीच्या आरोग्य कार्डातील (सॉईल हेल्थ कार्ड- Soil Health Card) फक्त खतांच्या शिफारशींचा वापर करून पिकाचे उत्पादन कधीच मिळणार नाही. जमिनीची निचरा शक्ती, कण रचना, जलधारण शक्ती, घनता, तापमान, हवेचे व्यवस्थापन, वाढ वृद्धिंगत करणारी संजीवके उपलब्ध करणे, पाण्याची प्रत अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. हा तांत्रिक भाग सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या समजून घेण्याच्या क्रयशक्तीपलीकडील आहे.
उत्पादन वाढविण्यासाठी खूप खर्चिक तंत्रे शेतकऱ्यांपुढे आणली जातात. याऐवजी संवर्धित शेती शेतकऱ्यांना शिकविणे गरजेचे वाटते. पूर्वमशागत, सेंद्रिय खत वापर, बेणे निवड, बेणे प्रक्रिया, खतांचे हप्ते म्हणजे ऊस उत्पादन असे नसून यापेक्षा खूप काही नवीन गोष्टी शेतकऱ्यांना शिकवणे गरजेचे आहे. यामध्ये पुढील गोष्टी महत्त्वाच्या आहेतः
१) संपूर्ण उसाचा बेणे म्हणून वापर करीत असता तयार बेणे २४ तासांच्या आत जमिनीत गेले तर उगवण जास्तीत जास्त मिळते. ऊस तोडून बेणे तयार करून ते मातीत गाडण्याचा काळ जसजसा २४ तासांच्या पुढे जाऊ लागतो, उगवण क्षमता कमी-कमी होते.
शेंड्याकडील बेण्याची उगवण क्षमता कमी-कमी होत नाही. त्याखालील उसाची क्षमता कमी कमी होत जाते. हा शास्त्रीय नियम माहीत असल्यास तसे लागवडीचे नियोजन करता येईल. रोज अर्धा दिवस ऊस तोडून बेणे तयार करावे. ते दुपारपर्यंत सोलून बेणे प्रक्रिया करून वरंब्यावर मांडून घ्यावे आणि २४ तासांच्या आत मातीत गाडावे. यामुळे नांगे कमी पडतात.
२) अलीकडे उसाची रोपे लावण्याची प्रथा वाढत चालली आहे. वाहतुकीस सुलभ जावे म्हणून कोकोपीट माध्यमात प्लॅस्टिक ट्रेमध्ये रोप तयार केली जातात. यातील कपात बेणे बसावे यासाठी बेण्याची लांबी ३० ते ४० सें.मी. ठेवावी लागते. हे करण्यासाठी मूळ बेण्यामध्ये डोळा ठेवून दोनही बाजूंनी छाटावे लागते. इथे मूळ कांडीचा बराच भाग छाटावा लागतो. वनस्पतिशास्त्र सांगते, की उसाच्या कांडीवरील डोळ्यातून उगवून आलेल्या रोपांना ४५ दिवसांपर्यंत त्या कांडीतील अन्नद्रव्यांवर वाढ होते.
त्यानंतर त्याची स्वतःची मुळे तयार होऊन जमिनीतील अन्नद्रव्याचे शोषण सुरू होते. ट्रेमधील रोप दोनही बाजूंनी छाटले गेल्यामुळे मूळ कांडीतून फार कमी अन्नपुरवठा झाल्याने रोप कमकुवत होते; परंतु तयार करणे व वाहतुकीतील सुविधा विचारात घेऊन ट्रेमध्ये रोप करणे पसंत केले जाते. अशी रोपे जागेला स्थिरस्थावर होण्यात एक महिना जातो. आज रोप लावले आणि आज कांडीची लावण थेट केली तर दोन महिन्यांनी निरीक्षण केले तर कांडीची लावण पुढे गेलेली असते; परंतु अनेक ठिकाणी जमिनीची अवस्था योग्य नसल्याने कांडीची योग्य प्रमाणात उगवण होत नाही. अशा ठिकाणी रोपाची लागवड बऱ्यापैकी काम करते.
३) ऊस लागवड करताना पूर्वी दुहेरी कांडी, नंतर एकेरी तोंडाला तोंड लावून आणि आता दोन डोळ्यांत ४५, ६० ते ९० सें.मी. अंतर ठेवून लागवड केली जाते. उसाच्या वाढीच्या अवस्थेचा अभ्यास केल्यास रोपावस्था, फूट, वाढ आणि पक्वावस्था अशा अवस्था असतात. रोपावस्थेचा काळ, तापमान, आर्द्रता, ओलावा, बेण्याची अवस्था, पाऊसमान यानुसार कमी-जास्त ८ ते १० दिवसांचा वाढू अगर कमी होऊ शकतो.
४) लागवड केल्यापासून साधारणपणे ४५ दिवसांनी फुटव्यांची अवस्था सुरू होते. पुढे ६० ते ७० दिवस ही अवस्था चालू राहते. दोन डोळ्यांमध्ये किती अंतर आहे, एका डोळ्यापासून किती फुटवे तयार होणे गरजेचे आहे, यावर फुटव्यांचा कालावधी ठरतो. लांब अंतरावरील लागवडीत फुटव्याचा कालावधी वाढतो, तर जवळ अंतरावरील लावणीत तो कमी होतो. फुटव्यांचा काळ कमी झाल्यास तितका वाढीच्या काळात वाढ होते, उत्पादन जास्त मिळविता येते. यामुळे बेणे बचत करण्याच्या कामात लांब अंतरावर कांड्या लावण्याचे प्रयोग बंद करून जवळ अंतरावर कांडी अगर रोप लावणेच चालू केले.
५) लागवडीचे अंतर कमी करण्यासाठी मला आणखी एक निरीक्षण उपयोगी पडले. उसाच्या एक बेटाचा मुळांचा पसारा २५० ते २८० सें.मी. त्रिज्येने सभोवती वाढत असतो असा संदर्भ मिळाला. दोन-चार बेटांची मुळे एकमेकांत मिसळून त्याचे कापड विणल्याप्रमाणे दाट जाळी तयार होते. असा मुळांचा पसारा एकमेकांत मिसळल्यास त्याची एक ताकद निर्माण होते. एकमेकांचा बेट उभे राहण्यास आधार मिळतो. ऊस पडण्याचे प्रमाण कमी होते. या संदर्भाचे वाचन पुस्तकात व प्रत्यक्ष रानात पाहावयास मिळाल्यानंतर लांब अंतरावरील लावणीचे प्रयोग बंद करून परत जवळ अंतरावर लावण करणे चालू केले आहे.
६) ऊस व्यवस्थापनाबाबत एक नवीन संदर्भ पुस्तकात मिळाला. कांडी जर डोळा वर करून मातीत दाबली तर डोळ्यातून बाहेर येणारा कोंब सरळ मातीबाहेर येऊ शकतो. याला बाहेर पडण्यास मातीच्या कमी अडथळ्याला सामोरे जावे लागते. या तुलनेत डोळा बाजूला ठेवला तर येणाऱ्या कोंबाला प्रथम आडवे वाढून पुढे काटकोनात वळून मग सरळ जमिनीबाहेर यावे लागते. या वाटचालीत मातीच्या जास्त विरोधाला तोंड द्यावे लागल्याने असा कोंब सरळ बाहेर पडलेल्या कोंबाच्या तुलनेत जास्त बळकट असतो.
मग प्रत्येक कांडी डोळा बाजूला ठेवून लावण्यापेक्षा डोळ्याच्या वरच्या बाजूला ४० ते ५० सें.मी. आणि खालच्या बाजूला १२० ते १५० सें.मी. ठेवून तोडावी. लावण्याच्या जागी काठीला टोक करून अंदाजे तितक्या उंचीचे भोक पाडून उभी काठी लावावी. लावण लवकर आटोपते. डोळ्याची दिशा पाहावी लागत नाही. सर्व कोंब प्रथम आडवे मग उभे वाढतात आणि मजबूत होऊन जमिनीबाहेर पडतात. काही नांगे पडण्याची शक्यता असते, ते योग्य वेळेत सांधून घ्यावेत.
संपर्क ः प्रताप चिपळूणकर, ८२७५४५००८८
(लेखक कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी आहेत.)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.