Nashik News ः जिल्ह्याच्या विविध भागांत शनिवारपासून (ता. ४) वादळी वाऱ्यासह पावसाचे संकट घोंगावत आहे. असे असताना सणासुदीत रविवारी (ता. ५) व सोमवारी (ता. ६) सलग दोन दिवस वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसाने अनेक तालुक्यांना झोडपून काढले.
मंगळवारी (ता. ७) पावसाने काहीशी उसंत दिली होती; मात्र कळवण व चांदवड तालुक्यांना गारपिटीचा तडाखा बसला. यामध्ये काढणीसाठी येणाऱ्या उन्हाळ कांद्याचे मोठे नुकसान झाले.
कळवण तालुक्यात पहिल्या टप्प्यात रब्बी हंगामात उन्हाळा कांदा लागवडी पूर्ण झाल्या आहेत. आता कांदा वाढणीच्या अवस्थेत आहे; अशात शनिवारी (ता. ४) तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाने दणका दिल्याने हिरवी मिरची व टॉमॅटो लागवडींचे नुकसान झाले.
त्यांनतर चौथ्या दिवशी मंगळवारी (ता. ७) गारपीट झाल्याने उन्हाळ कांदा पिकाचे नुकसान वाढण्याची शक्यता आहे.
कळवण तालुक्यात संध्याकाळी ६ नंतर बेज, बागडू, नाकोडा, भेंडी परिसरात अर्धा तास गारांसह पाऊस पडला. त्यामुळे रब्बी हंगामातील कांदा पीक धोक्यात येणार आहे. तर इतर ठिकाणी हलका पाऊस आणि विजांचा कडकडाट होता.
चांदवड तालुक्यातही सायंकाळी वादळी वाऱ्यांसह पाऊस व गारपिटीने गहू, कांदा आणि द्राक्ष पिकांचे नुकसान झाले. रात्री ८ च्या सुमारास वागदर्डी, खेलदरी व मनमाड परिसरात गारा पडल्याने मोठ्या प्रमाणात गहू व कांदा या पिकांचे नुकसान झाले.
रात्री ९.३० च्या सुमारास हलकी गारपीट आडगाव टप्पा परिसरात झाली. त्यामुळे लेट रब्बी हंगामातील काढणीस लेट खरीप कांदा व काढणीसाठी येत असलेला रब्बी उन्हाळ कांदा खराब होण्याची शक्यता आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.