
Nagpur News : राज्यातील खरीप आढावा बैठकांना यंदा विदर्भापासून सुरुवात होणार आहे. यातील पहिली बैठक गुरुवारी (ता. २७) नागपूर विभागाची होणार असून त्यानंतर शुक्रवारी (ता. २८) अमरावती विभागाचा आढावा घेतला जाणार आहे. या दोन्ही बैठकांना कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) उपस्थित राहणार आहेत.
यंदाच्या खरीप हंगामावर अल-निनोचे सावट आहे. पाऊसमान कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
त्या पार्श्वभूमीवर दर कमी असतानाही कमी पाण्यात तग धरणारे पीक म्हणून शेतकऱ्यांची यंदाही कापसाला पसंती राहील, असा विश्वास केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या संचालकांना आहे. त्यामुळेच देशात आणि राज्यात यंदाही सरासरी इतकीच कापूस लागवड राहील असे ते सांगतात.
दुसरीकडे यंदा कापूस आणि सोयाबीनचे दर दबावात राहिले. त्यामुळे शेतकरी पर्यायाच्या शोधात होते. मात्र सिंचन सुविधांचा अभाव असल्याने या दोन पिकांशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच यंदादेखील अमरावती विभागात १५ लाख हेक्टरवर सोयाबीन आणि दहा लाख हेक्टरवर कापसाची लागवड राहील, अशी शक्यता कृषी विभागाकडून व्यक्त केली जात आहे.
त्यानुसारच यंदाचा खरीप आराखडा तयार करण्यात आला आहे. पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया हे मुख्य धान उत्पादक जिल्हे आहेत. चंद्रपूर तसेच नागपूरच्या काही भागात धानाची लागवड होते.
नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत १९ लाख हेक्टर लागवड क्षेत्र आहे. यातील दहा टक्के क्षेत्रावर भाजीपाला व फळबागेला प्रोत्साहन देण्याचे कृषी विभागाचे नियोजन आहे. त्यानुसार तयारी करण्यात आली. कृषी विभागाच्या तयारीचा आढावा कृषिमंत्री सत्तार घेतील.
त्यानुसार पहिली खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठक गुरुवारी नागपुरातील वनामती येथे आणि शुक्रवारी अमरावतीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे होईल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.