
Akola News : लिंबूच्या हस्त बहराचे चांगले उत्पादन (Lemon production) काढण्यासाठी व्यवस्थापनात खत, संजीवकांचा वापर तसेच कीड व रोगांवर योग्य वेळी नियंत्रण मिळवणे हे महत्त्वाचे राहते, असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ डॉ. गजानन तुपकर यांनी केले.
बाळापूर तालुक्यातील निमकर्दा येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभागामार्फत लिंबू हस्त बहर या विषयावर शेतीशाळेचा शेतीदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. तुपकर, आत्मा तालुका तंत्र अधिकारी विजय शेगोकार, लिंबू उत्पादक तज्ज्ञ दीपक कातखेडे, डी. एन. पवार, कृषी सहायक धनंजय मोरे आदी उपस्थित होते.
डॉ. तुपकर पुढे म्हणाले, की लिंबू पिकातील हस्त बहराची फुले ऑक्टोबरमध्ये येतात व फळे ऐन उन्हाळ्यात (एप्रिल-मेमध्ये) मिळतात. या महिन्यात बाजारात फळांना भरपूर मागणी असल्यामुळे चांगला भाव येतो. बहर न धरल्यास कागदी लिंबाची झाडे वर्षभर फळे देऊ शकतात.
परंतु त्यामुळे झाडाची शक्ती वाया जाते. फळ योग्य तयार होत नाही. परिणामी, झाडावर एकाच वेळी फुले आणि लहान व मोठी फळे दिसून येतात. यामुळे फळांची राखण, रोग व किडींचा बंदोबस्त, फळांची काढणी व विक्री यांवर अधिक पैसा खर्च होतो.
त्यामुळे सोईस्कर एकच बहर धरणे फायद्याचे ठरते. जेथे पाऊसमान कमी आहे व जमीन हलकी आहे अशा भागात ऑक्टोबर बहर घेणे फायद्याचे ठरते, असेही डॉ. तुपकर यांनी सांगितले.
श्री. शेगोकार यांनी फळांची स्वच्छता व प्रतवारीबाबत मार्गदर्शन केले. प्रथम दर्जाची, आकर्षक, टवटवीत, मोठ्या आकाराची आणि ग्राहकांची पसंती लक्षात घेऊन अशी फळे मोठ्या आणि दूरवरच्या बाजारपेठांमध्ये पाठवण्याचा सल्ला दिला.
दीपक कातखेडे यांनी शेतकरी उत्पादक कंपनी व लिंबू पिकातील हस्त बहाराविषयी सविस्तरपणे मार्गदर्शन केले. कृषी सहायक धनंजय मोरे, कृषी मित्र विनोद खेडकर, किशोर पाटील यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.