
Parbhani News : वसुंधरेच्या (पृथ्वी) संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खते, कीटकनाशकांचा अमर्याद वापर टाळावा. जैविक खते, कीटकनाशकांचा वापर केल्यास प्रदूषण कमी होऊन शेतीची सुपीकता वाढेल, विविध दुर्धर आजारांना आळा बसेल. मित्र किडींचे संवर्धन होईल.
पिकांची उत्पादकता वाढेल तसेच शेतकऱ्यांच्या खर्चातही बचत होईल, असे प्रतिपादन कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागातील प्रा. डॉ. दिगंबर पटाईत यांनी केले.
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरोतर्फेजागतिक वसुंधरा दिनानिमित्त शनिवारी (ता.२२) कातनेश्वर (ता. पूर्णा, जि. परभणी ) येथे विशेष प्रचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
सरपंच कान्होपात्रा चापके, क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, मुख्याध्यापक राजू पांचाळ, शेषराव चापके,चंद्रकांत चापके, सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी सुमीत दोडल, दूरदर्शनचे प्रतिनिधी सुदर्शन चापके आदी उपस्थित होते.
जायभाये म्हणाले, की पर्यावरणाचे संतुलन आणि संरक्षणासाठी केंद्र सरकार करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. स्वच्छता, प्लॅस्टिकचा वापर टाळून त्याऐवजी कापडी पिशव्यांचा वापर, वृक्षलागवड व जीवनशैलीत बदल करून पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही याची प्रत्येक नागरिकांनी काळजी घ्यावी.
या रॅलीत विद्यार्थी आणि ग्रामस्थ सहभागी झाले. विजेत्या स्पर्धकांचा पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.