
Beed News : दीनदयाल शोध संस्थान, कृषी विज्ञान केंद्र (Agriculture Science Center), डिघोळआंबा यांच्या माध्यमातून एनबीसीएफडीसी यांच्या सौजन्याने बीड जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील अकरा गावांमध्ये एकूण १८ नारळ काथ्या-सिमेंट निर्मित जमिनीखालील पाणी साठवण हौद उभारले आहे.
त्याची पाहणी राष्ट्रीय मागास वर्ग वित्त व विकास निगम (एनबीसीएफडीसी) नवी दिल्लीचे वरिष्ठ व्यवस्थापक व्ही. चारी यांनी केली. या वेळी चारी म्हणाले, की कमी खर्चाचे पाणी साठवण हौद शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहेत.
प्रत्येक कुटुंबाने लघू व्यवसाय उभारणीस अल्प दरात कर्ज प्राप्तीसाठी कॅनरा बँक व पंजाब नॅशनल बँक यांच्याद्वारे वित्तीय कर्जाचा लाभ घ्यावा व कौटुंबिक विकास साधावा, असेही व्ही. चारी म्हणाले.
या प्रसंगी जलवर्धिनी प्रतिष्ठान मुंबईचे अभियंते उल्हास परांजपे, नाना पालकर समितीचे प्रमुख डॉ. अमर बहादूर ठाकूर, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत देशमुख, कृषी अभियंता प्रमोद रेनापूरकर उपस्थित होते.
या नारळ काथ्या - सिमेंट हौदातील पाण्याचा उपयोग करून अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला, फळझाडे जोपासत पशुधनाच्या पाणी पिण्यासाठी व घरगुती वापरही केल्याचे पाहून चारी यांनी समाधान व्यक्त केले.
शेतकऱ्यांनी स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे सांगून एकत्रित येऊन प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःचा व एकंदरीतच ग्राम विकास साधावा, असे आवाहन ठाकूर यांनी केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.