Alibag News : मार्च एडिंगची गडबड रायगड जिल्हा परिषदेमध्ये शिगेला पोहचली आहे. शनिवार, रविवारची सुटी असतानाही अर्थ विभाग, पाणीपुरवठा विभाग आणि ग्रामपंचायत विभागाचे कर्मचारी सकाळपासून कार्यालयात हजर होते.
मागील आठवड्यात जिल्हा परिषदेचे कर्मचारी जुन्या पेन्शनसाठी सात दिवस संपावर गेल्याने आर्थिक वर्ष समाप्तीची कामे रखडली आहेत.
नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी चालू वर्षाचा हिशोब, कंत्राटदारांची बिले देणे आवश्यक असल्याने या विभागातील कर्मचारी आठवडा सुटीच्या कालावधीतही कामाला लागले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावूनही कर्मचारी संप कालावधीत कामावर हजर झाले नव्हते. वर्षातील इतर दिवशी सामान्य नागरिकांची कितीही महत्त्वाची कामे असली, तरी सुटीचे कारण पुढे करणारे जिल्हा परिषदेचे कर्मचारी रविवारीही सकाळपासून थकीत बिले काढण्याच्या कामात गुंतले होते.
जिल्हा परिषदेमध्ये सर्वांत जास्त वर्दळ पाणीपुरवठा विभागात दिसून येत आहे. कर्मचाऱ्यांच्या बाजूलाच बसून जलजीवनचे कंत्राटदार आपल्या फाईली पूर्ण करून घेत होते.
अर्थ विभागातही तेच चित्र असून, कामाच्या बिलाला अंतिम मंजुरी मिळवण्यासाठी अनेक कंत्राटदारांनी संप संपल्यापासून जिल्हा परिषदेमध्ये ठाण मांडून बसण्यास सुरुवात केली. यात सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही दिसत आहेत.
१४ ते २० मार्च या दरम्यान जिल्हा परिषदेचे कर्मचारी संपावर गेले होते. या दरम्यान जिल्हा परिषदेमध्ये शुकशुकाट होता; मात्र सोमवारी संप मिटल्यानंतर मंगळवारपासून थकीत बिले मंजूर करून घेण्यासाठी कंत्राटदारांच्या फेऱ्या सुरू झाल्या.
संपामुळे मार्च एडिंगची कामे पूर्ण होऊ शकली नव्हती. त्या कामांचा उरक आता हे कर्मचारी सुटीच्या दिवसातही पूर्ण करत आहेत. मात्र, यात सर्वसामान्यांच्या नाही, तर कंत्राटदारांच्या समस्या सोडवण्यावर हे कर्मचारी प्राधान्य देत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून दिल्या जात आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.