
Water Project Story : मी दोन दिवसांपूर्वी तेलंगणा-महाराष्ट्राच्या बॉर्डरवर (Telangana-Maharashtra border) तेलंगणामध्ये असलेल्या मेडिगड्डा काळेश्वरम प्रकल्पाला (Medigadda Kaleswaram Project) भेट दिली. यावेळी त्या राज्यातील कॅबिनेट दर्जा असलेले एमएलसी विजय धांडे यांनी आम्हाला हा प्रकल्प दहा ते बारा तासात स्वतः सोबत येऊन फिरून दाखवला.
महाराष्ट्र तेलंगणाच्या बॉर्डरवर गडचिरोली जिल्ह्याला लागून प्राणहिता व गोदावरीच्या संगमावर हा प्रकल्प आहे. मेडिगड्डा प्रकल्प म्हणजे तेलंगणा सरकारची विक्रमी कामगिरी आहे.
या प्रकल्पाची पहिली मंजुरी २०१७ आणि प्रकल्प लोकार्पण जून २०१९ असा तीन वर्षात पूर्ण केलेला विक्रमी प्रकल्प म्हणून अवघ्या जगाने याकडे पाहिलेले आहे.
या प्रकल्पाला सुरुवातीला महाराष्ट्र सरकारने विरोध केलेला होता. त्याचे कारण या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील जमिनी मोठ्या प्रमाणावर पाण्याखाली जाणार होत्या.
तेव्हा दोन्ही सरकारांनी चर्चा करून हा प्रकल्प मंजूर जागेच्या काही किलोमीटर आणखी पुढे तेलंगणामध्ये व कमी उंचीचा करण्याचे ठरवले.
तेलंगणा सरकारने मेडिगड्डा येथे भव्य असा बंधारा बांधून नदीचे पाणी अडवले. तेथून ते पाणी निर्माण केलेल्या नदीने काळेश्वरम येथील जमिनीखाली ३०० मीटर वर निर्माण केलेल्या भल्या मोठ्या क्षमतेच्या तलावात नेऊन साठा केला.
या संपूर्ण प्रकल्पात १४१ टीएमसी पाणी साठविण्याची क्षमता आहे. आणि मेडिगड्डा येथील नदीवर बांधलेले बंधारे हे नदीच्या लेव्हलला बांधले असल्यामुळे गरज नसताना त्यातून पाणी नदीच्या खालच्या बाजूला जेव्हा सोडले जाते तेव्हा बंधाऱ्यात एक थेंबही साठून (मृतसाठा) राहत नाही. पाण्यामुळे बंधाऱ्यामागील शेतीचे नुकसान होत नाही.
आता आपण काळेश्वरम उपसा प्रकल्प समजून घेऊ. मेडिगड्डा येथील बंधाऱ्यात अडवलेले पाणी जेव्हा मानव निर्मित नदीने काळेश्वरम प्रकल्पात आणले व साठवले जाते तेव्हा ते जमिनीच्या खाली तीनशे ते चारशे मीटरवर साठते.
म्हणून त्या ठिकाणी एक लाख ऐंशी हजार एचपी चे सात महाकाय विद्युत मोटार पंप चालवून त्याचा उपसा केला जातो. हा उपसा दररोज तीन टीएमसी करण्याची त्या पंपाची क्षमता आहे.
नांदेड येथील बाभळी बंधाऱ्याची साठवण क्षमता केवळ आठ टीएमसी आहे. म्हणजे त्या मोटारींनी आपला बाभळी बंधारा केवळ तीन दिवसात भरला किंवा उपसला जाईल. यावरून त्या महाकाय विद्युत पंपाची व त्या नेत्यांची विशालता समजून येते.
आता हे विद्युत मोटारीने उपसलेले पाणी कॅनॉल ने दुसऱ्या अनेक मानवनिर्मित तलावात सोडले जाते. व हे काम पावसाळ्यात करून सर्व तलाव भरून घेतली जातात. पुढे अजून दोन ठिकाणी उपसा करून पाणी पुढे नेल्या जाते.
म्हणजे एकूण तीन ठिकाणी महाकाय विद्युत मोटारी वापरून हे पाणी तेलंगणामधील दहा जिल्ह्यातील १०० टक्के शेतीला मोफत दिले जाते. तसेच उद्योग व शहरांना सुद्धा ह्याच प्रकल्पामार्फत पूर्णवेळ पाणी पुरवठा केला जातो.
हैद्राबाद शहरातील निजामसागर व अन्य अनेक छोटी-मोठी धरणे ह्याच प्रकल्पाच्या पाण्याने पावसाळ्यातच भरून घेतली जातात. यावर्षी कलेश्वरम या प्रकल्पाची उंची वाढवलेली आहे.
त्यावर एकदा दार बसले तर नांदेड जिल्ह्यातील बाभळी बंधाऱ्यात त्याचे बॅक वॉटर येईल अशी माहिती मिळाली. तेव्हा आपल्या बाभळी बंधाऱ्याचा सुद्धा प्रश्न आपोआप सुटेल असे वाटते.
आता मला प्रश्न पडतो की यावरून महाराष्ट्र कधी बोध घेणार? मराठवाड्यात व विदर्भात असे एक एक प्रकल्प केले तरी येथील संपूर्ण जमीन सिंचनाखाली येईल. किंवा सह्याद्रीच्या कडेकपारीत पाणी साठवले व ते उपसा करून तहानलेल्या मराठवाड्याला पुरवले तर येथील पाण्याचे कायमचे प्रश्न सोडवले जातील.
पण हे व्हिजन व त्या नेत्यासारखा प्रामाणिकपणा आपल्याकडील नेत्यांमध्ये दुर्दैवाने नाही. म्हणून आपल्या नेत्यांकडून असं काही होईल याची थोडी सुद्धा शाश्वती वाटत नाही.
संतोष गव्हाणे, प्रदेशाध्यक्ष - संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडी (९७६३३९०८७६)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.