
Solapur News : जिल्ह्यातून जाणाऱ्या सुरत-चेन्नई ग्रीन फिल्डच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांकडून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर संबंधितांशी चर्चेसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी येत्या मंगळवारी (ता. २१) मुंबईत बैठक बोलावली आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही यामध्ये सहभागी होणार असल्याचे मंत्री विखे-पाटील यांच्याकडून सांगण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून साततत्याने या विषयावरून आंदोलने आणि निवेदने प्रशासनाला दिली जात आहेत. नियोजन समितीच्या बैठकीच्या वेळीही हा विषय पालकमंत्र्यांसमोर उपस्थित झाला होता.
त्यावेळी पालकमंत्री विखे-पाटील (Minister Radhakrishna Vikhe-Patil) यांनी स्वतः शेतकऱ्यांशी चर्चेने हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. तसेच शेतकऱ्यांच्या मनातील रोष पाहून यासंबंधी लवकरच बैठक बोलावून मार्ग काढू, असे आश्वासन दिले होते.
मुंबईत नुकतीच कासेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथील बाधित शेतकरी परमेश्वर गाढवे, अमोल वेदपाठक, विक्रम गाढवे, महेश भोज, चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासह काही शेतकऱ्यांनी पुन्हा पालकमंत्री विखे-पाटील यांची भेट घेतली.
त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून यावर तोडग्यासाठी बैठकीबाबत निर्णय घेतला. त्यानुसार ही बैठक होत आहे.
स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्थानिक आमदार यांच्यासोबत ही बैठक होईल.
जिल्ह्यातील तांदूळवाडी ते केगाव नवीन बाह्यवळणाच्या (रिंगरुट) भूसंपादनातील मोबदला आणि सुरत ते चेन्नई या ग्रीनफिल्डमध्ये संपादित होणाऱ्या जमिनीच्या वाढीव मोबदल्यावर यामध्ये चर्चा होईल, असे सांगण्यात आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.