
Jalgaon News : खानदेशात नदीकाठीदेखील टंचाई तयार होत आहे. बेसुमार वाळू उपशाने नदीकाठच्या विहिरी, कूपनलिकांचे पुनर्भरण होत नसल्याने जलसाठे कमी होत असल्याची स्थिती असून, ही समस्या दूर करण्यासाठी गिरणा, अनेर, पांझरा, तापी नदीत पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे.
अनेर नदीतून पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी अलीकडेच शेतकरी कृती समितीचे एस.बी.पाटील व इतरांनी केली होती. तसेच गिरणा नदीत पाच महिने कानळदापर्यंत (ता.जळगाव) आवर्तन सोडले जाते. गिरणा नदीवर भोकणी (ता.धरणगाव) नजीक पुलाचे काम सुरू आहे.
परंतु यासंबंधीचा अडथळा आवर्तनास नसल्याने यंदा दोनदा पाणी सोडण्यात आले आहे. यातच गिरणा काठी व इतर भागात बेसुमार वाळू उपसा सुरू असतो. गेले 25 वर्षे वाळू उपसा सुरू असल्याने गिरणा नदीकाठच्या अनेक गावांमध्ये टंचाई तयार झाली आहे. ही टंचाई दूर करण्यासाठी नदीत पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे.
अन्यथा गावांच्या सार्वजनिक विहिरी, कूपनलिकांचे जलस्रोत आटतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पांझरा नदीतूनही पाण्याची मागणी धुळे, शिंदखेडा व अमळनेर तालुक्यातून केली जात आहे. नदीकाठी टंचाई आहे. पशुधनासह पिण्याच्या पाण्याची समस्या पुढे तयार होवू शकते, यामुळे नदीत पाणी सोडण्याची गरज आहे.
यामुळे किमान ८० गावांमधील टंचाई दूर होईल, असा विश्वास शेतकरी, ग्रामस्थांना आहे. अनेर प्रकल्पातून रब्बीसाठी पाणी व्यवस्थितपणे सोडले आहे. परंतु अनेर नदीकाठीदेखील पुढे टंचाई तयार होवू शकते.
चोपडा, शिरपूर तालुक्यासाठी या नदीचा लाभ होत असतो. नदीकाठीदेखील अनेक सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरी, कूपनलिका आहेत. तापी नदीचा लाभही भुसावळ, यावल, चोपडा, अमळनेर, शिरपूर या तालुक्यांना होतो.
या नदीतून पाणी सोडण्याची मागणीदेखील जळगाव, यावल, अमळनेर भागातील मंडळी करीत आहे. सध्या उष्णता वाढत आहे. यामुळे गावोगावी पाण्याचा वापर वाढला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.