Tourism : पर्यटनाच्या नव्या दिशा
सव्वाशे वर्षांपूर्वी पर्यटन (Tourism) हे आपापल्या तालुक्यातील एखाद्या महत्त्वाच्या धार्मिक स्थळाभोवती केंद्रित होते. घरातल्या ज्येष्ठ लोकांना व विशेषतः आईवडिलांना काशीयात्रा (Kashi Yatra) घडवून आणणे हा मुलांच्या कर्तव्याचा आवश्यक भाग होता. अशी यात्रा झाल्यावर मावंद घालायची पद्धत होती. गावातल्या लोकांना व नातेवाइकांना थाटामाटात जेवण दिले जाई. पर्यटनाची सुरुवात ही मुख्यतः लग्नाच्या निमित्ताने घडत असे.
नव्या नवरा-नवरीबरोबर आपापल्या कुलदेवतेला म्हणजे तुळजापूरला किंवा जोतिबाला जाऊन येणे ही अनेकांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात असे. पर्यटक हा शब्द १९०० च्या शतकाच्या सुरुवातीला वापरला जाऊ लागला. १९४० ते १९५० च्या दरम्यान ब्रिटिश कॉमनवेल्थमध्ये अनेक देश सामील झाले आणि विकासातील पहिले पाऊल म्हणून परकीय चलन मिळविण्यासाठी पर्यटनाला चालना देण्याचे प्रत्येक सरकारने प्रयत्न केले. आता आधुनिक काळात पर्यटन हा एक सगळ्यात मोठा आंतरराष्ट्रीय उद्योग म्हणून विकसित झाला आहे.
सुरुवातीच्या काळात हे पर्यटन मुख्यतः देशांतर्गत धार्मिक व पवित्र तीर्थक्षेत्रांच्या गावी होत असे. दूर अंतरावर रेल्वेने चारधाम यात्रा, कन्याकुमारी, हरिद्वार, ऋषिकेश अशा तीर्थक्षेत्राच्या सहली होऊ लागल्या. पर्यटनाच्या बरोबर आठवण म्हणून त्या त्या भागातल्या वस्तू खरेदी करण्याकडे लोकांचा कल झाला. मागच्या पिढीतल्या अनेक लोकांकडे महाबळेश्वर वरून आणलेल्या काठी, आग्रा येथून आणलेल्या ताजमहलची प्रतिकृती अशा गोष्टी आढळून येतात.
हळूहळू रस्त्यांचे जाळे विकसीत झाल्यावर वैयक्तिक वाहनांनी पर्यटन सुरू झाले. अनेक वेळा धार्मिक स्थळांच्या भेटी घडल्यावर अन्य ठिकाणी देखील पर्यटन करण्यासाठी नवनवीन स्थळे शोधली जाऊ लागली. यामध्ये संग्रहालय, इतिहास प्रसिद्ध स्थळे, नैसर्गिक रम्य ठिकाणे, प्राचीन स्तूप, स्तंभ, विहार, स्मारके व कला निर्मितीची केंद्रे यांचा समावेश होऊ लागला.
काही लोक नोकरीच्या निमित्ताने सभा, परिषदांच्या निमित्ताने बाहेरगावी गेल्यावर जवळची दोन-चार ठिकाणे पाहण्याची हौस पूर्ण करू लागली. जागतिक पातळीवर थॉमस कूक या व्यक्तीने सर्वप्रथम ६०० लोकांची लिसेस्टर ते लाफबरो अशी रेल्वे सहल आयोजित केली. त्याने १८५५ च्या काळात पॅरिसमध्ये व युरोपमध्ये भव्य सहली आयोजित केल्या व त्यामुळे त्याला आधुनिक पर्यटन विभागाचा प्रारंभकर्ता असे म्हणतात.
ग्रामीण महाराष्ट्रात देखील पर्यटनाचा मोठा परिणाम झाला. पारंपरिक ठिकाणांशिवाय महाराष्ट्र परिवहन विकास महामंडळाने विकसीत केलेले चिखलदरा, वेंगुर्ला, पैठण, पाचगणी, कार्ला अशी नवनवी पर्यटन स्थळे निर्माण झाली आहेत. गेल्या २० वर्षात तरुणांनी ट्रेकींगच्या निमित्ताने सह्याद्रीचे कडे, गड किल्ले, थंड हवेची ठिकाणे व राज्यातील कोपरा न् कोपरा पिंजून काढला आहे. पर्यटनामुळे दुर्गम भागात सुद्धा पर्यटकांची वर्दळ वाढू लागली, पैसा खेळू लागला आहे.
ईशान्येकडील देश, उत्तराखंड, हिमाचल, लेह-लडाख अशा भागात सेवा क्षेत्राची वाढ होण्यात पर्यटन क्षेत्राने मोठी मदत केली आहे. रोजगाराच्या संधी मिळण्यास हातभार लागला आहे. हॉटेल व्यवसाय, रिटेल शॉप, वाहन व वाहतूक व्यवस्था, करमणूक क्षेत्र, गेमींग, खाद्य व्यवसाय या सगळ्यांवर पर्यटनाचा मोठा सकारात्मक आर्थिक परिणाम होतो. सुमारे १३.२ लाख कोटी डॉलर एवढे परकीय चलन मिळवून देणारा, ५.८ टक्के सकल राष्ट्रीय उत्पन्न देणारा व ३२.१ दशलक्ष रोजगार निर्माण करणारा भारतीय पर्यटन उद्योग आहे.
तामिळनाडू व महाराष्ट्र ही परदेशी पर्यटक सर्वांत जास्त संख्येने येणारी राज्ये आहेत. पर्यटनामुळे समाजातल्या विविध घटकांमध्ये पैसा फिरतो. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये फार भर पडतो. त्याचे ज्वलंत उदाहरण आपल्याला मसुरीसारख्या ठिकाणी किंवा हैद्राबाद मध्ये पाहायला मिळते. मसुरीच्या राष्ट्रीय प्रबोधिनीमध्ये दरवर्षी एक हजार पेक्षा जास्त अधिकारी प्रशिक्षणाला जातात. त्यामुळे मसुरीतील खाद्यगृह, हॉटेल, उलनचे कपडे, पुस्तकालय अशा दुकानांची आर्थिक उलाढाल चांगल्या प्रमाणात होते. हीच गोष्ट अलाहाबाद, बनारस, हरिद्वार, कन्याकुमारी, तिरुपती येथील धार्मिक पर्यटनाच्या निमित्ताने पाहायला मिळतात.
पर्यटनामुळे विविध स्वरूपांच्या रोजगारांमध्ये वाढ होते. हिमालयामधील पर्यटनामध्ये मार्गदर्शक, ओझे वाहणारे लोक, खेचरावरून प्रवासाची वाहतूक करणारे लोक, आचारी अशा अनेक प्रकारचे रोजगार निर्माण होतात. या शिवाय सहली आयोजित करणाऱ्या ट्रॅव्हल कंपन्या, बस चालक, टुरिस्ट गाइड हा सगळा हिशेब ठेवणारे अकाउंटंट, आचारी, मनोरंजन करणारे लोक, फोटोग्राफर असे रोजगार निर्माण होतात. स्वित्झर्लंडसारख्या छोट्या देशातील अनेक काम करणाऱ्या लोकांपैकी ५ टक्के लोक हे पर्यटन क्षेत्रात गुंतलेले आहेत.
थायलंड, सिंगापूर, मलेशिया हे देश पर्यटनाला मध्यवर्ती ठेवून देशाची आर्थिक गणिते जमवू पाहत आहेत. 'पर्यटक होऊ नका तर प्रवासी व्हा’ असे एक सुभाषित आहे व संपूर्ण जग अधिक जवळ येत आहे. अशावेळी रसेल बेकरचे पर्यटनावरील सुभाषित कसे विसरता येईल ? तो म्हणतो, की पर्यटक म्हणून सर्वांत वाईट काय असेल तर ते म्हणजे इतर पर्यटकांनी तुम्हाला पर्यटक म्हणून ओळखणे!
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.