
Mahad : महाड लाटवणमार्गे दापोली व मंडणगड मार्गावर रेवतळे गावाजवळ असलेला नागेश्वरी नदीवरील नवीन पूल जोड रस्ता नसल्याने सात वर्षांपासून रखडला होता.
पुलाच्या दोन्ही बाजूला जोड रस्त्याकरिता लागणारी शेतकऱ्यांची जमीन संपादित न केल्याने व मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या हरकतीमुळे ही समस्या निर्माण झाली होती. परंतु आता हा प्रश्न सुटल्याने रेवतळे नवा पूल वाहतुकीला खुला झाला आहे.
दोन वर्षांपूर्वी पुलावरून पाणी जात असतानाही एसटी बस रेवतळे जुन्या पुलावरून नेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने रेवतळे येथील नवीन पुलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता.
महाड तालुक्यातील रेवतळे गावाजवळ महाड लाटवण मार्गे दापोली तसेच मंडणगड मार्गावर एक कमी उंचीचा जुना पूल आहे.
पावसाळ्यात या पुलावरून पाणी जात असल्याने अनेकदा वाहतूकही ठप्प होते. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात सार्वजनिक व खासगी वाहतूक होते.
आंबिवली येथे होत असलेल्या नागेश्वरी धरणाच्या बुडीत क्षेत्रात जुना पूल येत असल्याने जवळच नवीन पूल बांधण्यात आला आहे. पुलाचे काम बहुतांशी पूर्णही झाले होते.
२०१५ मध्ये पुलाचे काम मंजूर झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधल्या जाणाऱ्या पूल बांधण्यासाठी ३ कोटी ७० लाख रुपयेही मंजूर झाले.
परंतु काम सुरू होण्यापूर्वी पुलाला जोडणाऱ्या दोन्ही बाजूकडील रस्त्याला लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन करण्यात आले नव्हते.
भूसंपादन कायद्याप्रमाणे, किमान तीन एकरच्या पुढील जमिनी संपादित करावयाच्या असतील तरच सरकरी नियमानुसार संपादन करता येते, मात्र याठिकाणी कमी क्षेत्र संपादन असल्याने हा प्रश्न उपस्थित झाला.
पुलाजवळील जोड रस्त्याची जमीन संपादित करण्यात आली नाही तसेच मोबदलाही न मिळाल्याने शेतकऱ्यांनी पुढील काम थांबवले होते.
येथील शेतकऱ्यांनी आधी भूसंपादनाचा मोबदला मिळावा, मगच पूल पूर्ण करावा अशी भूमिका घेतल्याने सात वर्षांपासून नवीन पूल जोडरस्त्याअभावी वापरात नव्हता. त्यामुळे वाहनचालक व प्रवासी मेटाकुटीला आले होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.