
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (Research Council) भुवनेश्वर येथील केंद्रीय कृषिरत महिला संस्थेने महिलांमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी तंत्रज्ञान प्रसारासह उद्योजकता वाढीचा एक प्रकल्प राबवला होता. त्यातून दोन गावांतील सुमारे ४० महिलांच्या गटांच्या उत्पन्नामध्ये आणि पोषण सुरक्षेमध्ये वाढ करण्याचा विडा उचलला होता. त्यातही चांगलेच यश आले. तसेच अधिक उत्पन्न गटातील महिलांमध्ये शेतीपूरक उद्योगाच्या माध्यमातून उद्योजकतेचे बीज रोवण्यातही संस्था यशस्वी ठरली.
कोणत्याही समाजातील सर्वांत दुर्लक्षित घटक कोणता असेल, तर तो आहे महिला. त्यातही ग्रामीण भागातील महिलांच्या कष्टाला तर सीमाच नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत कुटुंबासाठी राबूनही त्यांच्यांमध्ये कुपोषणाच्या आणि आरोग्याच्या समस्याही सर्वाधिक आहेत. अशा वेळी महिलांच्या सामाजिक उत्थानासाठी अधिक प्रयत्नाची आवश्यकता आहे. हे लक्षात घेता भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या भुवनेश्वर येथील केंद्रीय कृषिरत महिला संस्थेने महिलांमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी एक प्रकल्प राबवला होता.
या प्रकल्पामध्ये ओडिशा येथील सांकिलो आणि तेंटलपूर या निश्किंतकोईली मंडल जि. कटक येथील दोन गावांतील चाळीस शेतकरी महिलांची निवड केली होती. सर्वप्रथम सर्वेक्षण करून महिलांचे आरोग्य, पर्यावरण आणि आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या वापराच्या दृष्टीने सामाजिक स्थान जाणून घेतले. (याला शास्त्रीय भाषेमध्ये SHEET Module म्हणतात.) त्यातून या गावामध्ये असलेल्या पुरुष आणि महिलांमध्ये असलेल्या लिंगआधारित भेदभावाची नेमकी कल्पना येण्यास मदत झाली.
या महिलांच्या शेतीक्षेत्रानुसार तीन गटामध्ये विभागण्यात आले. त्यानुसार अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील महिलासाठी जीवनशैली सुधार प्रारूप, मध्यम उत्पन्न गटातील महिलांसाठी पोषण सुरक्षा प्रारूप आणि उच्च उत्पन्न गटातील महिलांसाठी उद्योजकता प्रोत्साहन प्रारूप तयार करण्यात आले. या सर्व महिला संस्था, परिसरातील उद्योग आणि अन्य निविष्ठा साखळीशी जोडण्याचे नियोजन करण्यात आले.
पहिला गट ः
पहिल्या जीवनशैली सुधार प्रारूपातील महिलांसाठी भाजीपाला उत्पादनाची प्रात्यक्षिके घेण्यात आली. या प्रयोगामध्ये या महिलांना अधिक उत्पादनक्षम फळ पिकांची ओळख करून देण्यात आली. त्यामुळे पारंपरिक पिकाच्या तुलनेमध्ये उत्पादनातील वाढ ४७.८५-४९.५२%, तर उत्पन्नातील वाढ ६९.७४-११९.३०% इतकी होती.
या प्रात्यक्षिकांमधून या महिलांच्या सरासरी उत्पन्नामध्ये वार्षिक रु. १,१६,९२३/- पासून ३,१५,००५ इतकी वाढ झाली. तर निव्वळ नफा रू. ५०,१०७/- पासून वाढून १,८९,९५५ रुपयांवर पोचला. वार्षिक उत्पादनातील वाढ ४५.५१ ते ६८.९३% होती, तर निव्वळ उत्पन्नातील वाढ १५५-२०३% इतकी होती.
दुसरा गट ः
दुसऱ्या पोषण सुरक्षा गटातील महिलांसाठी पोषण आधारीत शेतीसंदर्भात जागरूकता निर्माण करण्यात आली. यांच्या शेतामध्ये पोषकमूल्ययुक्त भाज्या आणि फळांच्या उत्पादनाला प्राधान्य देण्यात आले.
यामध्ये भात उत्पादनाचे उदाहरण घेऊ. सुधारीत भात जात सीआर धान ३१२ चे सरासरी उच्च उत्पादन ६.६८ टन प्रति हेक्टर मिळाले. या पिकाचा उत्पन्न खर्च गुणोत्तर २.५० इतके होते. यातून सरासरी निव्वळ उत्पन्न रु. १,१३,०००/- आणि एकूण उत्पन्न रु. १,२६,२९०/- प्रति हेक्टर मिळाले. पारंपरिक भात पिकाच्या तुलनेमध्ये उत्पादनातील वाढ ही ६४.४०% होती, तर निव्वळ उत्पन्नातील वाढ ही १४५.२६% होती.
सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे या सीआर धान ३११ (मुकूल) आणि सीआर धान ३१५ या जाती अधिक प्रथिनयुक्त आहेत. त्यातून या शेतकरी कुटुंबांना अनुक्रमे हेक्टरी ३.२६ आणि ३.३० क्विंटल इतकी अधिक प्रथिने उपलब्ध झाली. त्याच प्रमाणे या जातींमध्ये जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाणही प्रति व्यक्तीच्या गरजेइतकेच म्हणजे २० ते २२ पीपीएम इतके आहे.
सोबतच उडीद पीक घेण्यात आले. उडदाच्या पीयू ३१ या जातींचे सरासरी हेक्टरी उत्पादन १.२८ टन इतके नोंदवण्यात आले. पारंपरिक उडीद जातीच्या तुलनेमध्ये उत्पादनामध्ये ६३.०८%, निव्वळ उत्पन्नांमध्ये प्रति वर्ष रु. २९.६८७ इतकी वाढ मिळाली. उडदाचे उत्पन्न खर्च गुणोत्तर वाढून १.६८ पासून २.४२ वर पोहोचले. त्यामुळे उत्पन्नातील वाढ ८४.७४% मिळाली. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे महिलांच्या कुटुंबांच्या प्रथिनांची मोठी गरज उडदामुळे पूर्ण होण्यास मदत झाली.
तिसरा गट ः
उद्योजकता प्रोत्साहन प्रारूपांतर्गत उच्च उत्पन्न गटातील महिलांना भात भुश्शावर अळिंबीचे उत्पादन घेण्यास प्रोत्साहन देण्यात आले. या उद्योगातून ९७१.१ किलो अळिंबीचे उत्पादन मिळाले. त्यातून एकूण रु. १,७४,७९८ इतके उत्पन्न मिळाले. या पैकी रु. १,५७,६४९ किमतीची अळिंबी खुल्या बाजारामध्ये विकली, तर रु. १७,४७९ किमतीची अळिंबी घरामध्ये खाल्ली गेली.
प्रति १०० बेड सरासरी रु. २६,०४० उत्पन्न मिळाले. या उद्योगाच्या उत्पन्न खर्चाचे गुणोत्तर २.०६ ते ४.२१ राहिले. शास्त्रज्ञांच्या मदतीने शास्त्रीय पद्धतीने अळिंबी उत्पादन घेतल्यामुळे उत्पादनातील वाढ ५४.९९% इतकी होती. या घरगुती उद्योगामुळे कुटुंबाच्या उत्पन्नामध्ये सरासरी १३३ टक्के वाढ झाली. तसेच उत्पन्नाचा एक नवीन स्रोतही तयार झाला.
या महिलांतील उद्योजकतेला चालना देण्यासाठी अनन्या शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करण्यात आली. त्यातून महिलांनी उत्पादित केलेल्या शेतीमाल, अळिंबीच्या विक्री करण्यात येत आहे. यामुळे केवळ शेती उत्पादन वाढीवर थांबून न राहता, महिला व कुटुंबाची पोषकता आणि महिला उद्योजकता विकासाला चालना मिळत आहे.
(स्रोत ः केंद्रीय कृषिरत महिला संस्था, भुवनेश्वर)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.