
Nashik News : लेट खरीप कांद्याला उत्पादन (Onion Production) खर्चपेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची असून नगरसुल (ता.येवला) येथील कांदा उत्पादक शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी हतबल होऊन सोमवार (ता.६) रोजी होळीच्या दिवशी कांद्याचा अग्नीडाग देत कांद्याची होळी (Onion Holi) केली.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या कांदा धोरणाविषयी असलेली संताप दिवसेंदिवस उफाळून घेत असल्याचे पाहायला मिळत आहेत.
डोंगरे यांनी या कांदा अग्निडाग समारंभासाठी लग्नसारखी निमंत्रण पत्रिका तयार करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते. तर "आपण दिवसाआड दिल्ली दौरा करत आहेत, आपण शेतकऱ्यांसाठी एखादा दौरा केला पाहिजे.
आपणाकडून काही अपेक्षा नाहीत,आपण काही करू शकत नसाल तर किमान मी ठेवलेल्या कांदा अग्नीडाग कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहा, त्यासाठी हे निमंत्रण" या आशयाचे पत्र स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले होते.हे पत्र व निमंत्रण पत्रिक सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती.
त्यानुसार सकाळी अकरा वाजता कांद्याची होळी केली. कांद्याला हमीभावच मिळत नाही. केलेला खर्चही वसूल होत नाही.त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे डोंगरे यांनी सांगितले. गेल्या ८ दिवसात कांद्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.
होळीच्या दिवशी सरकारच्या धोरणाला वैतागून या शेतकऱ्याने तब्बल दीड एकरावरील कांद्याला अग्निडाग दिला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे.
आजचा दिवस काळा दिवस आहे.शेतकरी जगला काय आणि मेला काय सरकारला देणे-घेणे नसल्याचे सांगत शेतकऱ्याने व्यथा मांडली.
मेहनत करूनही कांद्याला हमीभाव मिळत नाही.कांदा दरात झालेली घसरण, सरकारची फसवी आश्वासने, नाफेडची कांदा खरेदी यातून हे पाऊल उचलल्याचे आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी सांगितले.
नाफेड कांदा खरेदी पूर्णपणे शेतकरीविरोधी
नाशिक जिल्ह्यात कांदा दरातील घसरण सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.कांदा दरातील घसरणीपाठोपाठ शेतकऱ्यांनी आंदोलने, रास्तारोको केला.मात्र,तरी देखील परिस्थिती ‘जैसे थे’आहे.
त्यामुळे कृष्णा डोंगरे यांनी टोकाचे पाऊल कांदा पेटवून देत संताप व्यक्त केला. डोंगरे म्हणाले, आज दीड एकर कांदा काढणीला परवडत नाही. कांद्याला आतापर्यंत सव्वा लाख रुपये खर्च लागलेला आहे. बाजारात गेलो तर आणखी तोटा सहन करावा लागत आहे.
त्यामुळे हा कांदा जाळण्याची वेळ माझ्यावर आलेली असून सरकारने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यातच सुरू झालेली नाफेड कांदा खरेदी पूर्णपणे शेतकरीविरोधी असून ती ग्राहकांसाठी काम असल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.
"शेतकऱ्यांसमोर वीज, शेतमाल भाव, सिंचन, कुटुंबाचे आरोग्य, मुलामुलींचे शिक्षण, लग्न असे अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांना कांदा रडवतोय, राजकारणी मात्र सत्ता संघर्षात धुंद आहेत. एकरी ५० हजार रुपये तोटा होत आहे. मात्र भाजप सरकारला काही घेणं देणं नाही.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.