
Crop Damage In Beed : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांमागे संकटाचे फेरे सुरुच आहेत. पंधरवड्यात दुसऱ्यांदा गारपिट (Hailstorm) व अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) झाला आहे.
शनिवारी (ता. ८) अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि वीज पडल्याने एक शेतकऱ्यासह लहान - मोठ्या २० जनावरांचा मृत्यू झाला. तर, दोन शेतकरी जखमी झाले.
अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा पाच तालुक्यांतील शंभर गावांना बसला असून यामुळे २७६२ हेक्टरांवरील रब्बी पिकांसह फळपिके व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले.
दुपारनंतर जिल्ह्यात अचानक वादळी वारे, विजांचा कडकडाट व गारपीट झाली. गारपीट, वादळी वारे व अवकाळी पावसाचा तडाखा बीड, गेवराई, आष्टी, पाटोदा, केज या तालुक्यांत प्रामुख्याने बसला आहे.
यामध्ये शंभर गावांतील २७६२ हेक्टरांवरील डाळिंब, लिंबू, द्राक्ष, कांदे, मिरची, टरबूज, गहू, अंबा व भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. यात ४३२७ बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे.
शनिवारी विजांच्या मोठा कडकडाटासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. वीज पडून आष्टी तालुक्यातील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर, बीड तालुक्यातील दोन शेतकरी वीज पडून जखमी झाले आहेत.
बीड व केज तालुक्यांत प्रत्येकी पाच - पाच मोठे जनावरे वीज पडून ठार झाले. तर, पाटोदा व शिरूर कासार तालुक्यात देखील प्रत्येकी दोन - दोन जनावरे ठार झाले आहेत. तर, शिरूर कासार तालुक्यात एक, पाटोदा तालुक्यात चार व केज तालुक्यात एक अशा सहा लहान जनावरांचा मृत्यू झाला आहे.
वादळी वाऱ्यामुळे शेतातील सौर कृषिपंपांचे नुकसानही झाले आहे. सौर कृषिपंपांचे सेट उखडून पडले आहेत. गारपीट, वादळी वारे व अवकाळी पावसाने गेवराई, आष्टी, पाटोदा, केज तालुक्यातील ४३२७ शेतकऱ्यांचे २७६२ हेक्टरांवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने द्राक्ष, अंबा, लिंबू व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.