
Ratnagiri Weather News : चिपळूण आणि रत्नागिरी तालुक्यात सलग दोन दिवस पडलेल्या अवकाळी पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळल्यामुळे पहाटेपासून वाहतूक कोंडी झाली होती. विजांच्या गडगडाटासह पाऊस झाला. त्यामुळे आंबा बागायतदार, वीटभट्टी व्यावसायिक आणि अन्य शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती.
हवामान खात्याचा अंदाजानुसार सोमवारी दुपारी तीन ते चारच्या सुमारास पाऊस सुरू झाला. पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळल्यामुळे पहाटेपासून वाहतूक कोंडी झाली. माती रस्त्यावर आल्याने गाड्या घसरत होत्या.
पहाटेच्या सुमारास पावसामुळे माती खाली आली. परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे पर्यायी मार्गाने लोटे-चिरणी-कळंबस्ते – चिपळूण मार्गाने वाहतूक वळविण्यात आली होती. तेथेही वाहतूक कोंडी झाली आहे.
चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाचा जोर होता. या पावसामुळे कुठेही नुकसान झालेले नाही. काही ठिकाणी गारा पडल्या. पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला. चिपळूण तालुक्यातील अलोरे, शिरगाव, पोकळी, पेढांबे, कोंडफसवणे, कुंभारली, कोळकेवाडी आदी भागांत जोरदार पाऊस झाला. अर्ध्या तासाहून अधिक काळ पाऊस पडत होता.
अचानक आलेला पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. खडपोली, अनारी, वेहळे, अडरे या भागात वीट व्यावसायिक मोठ्याप्रमाणावर आहेत.
उरलासुरला आंबाही धोक्यात
अवकाळी पावसानंतर शेतकऱ्यांसह वीटभट्टी व्यावसायिकांची धावपळ उडाली. विटा खराब होऊ नयेत म्हणून त्यावर प्लास्टिक कापड व अन्य बचावाचे साहित्य ठेवले जात होते. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह वीट व्यावसायिक चिंताग्रस्त झाले आहेत.
या पावसाचा परिणाम अंतिम टप्प्यात असलेल्या आंबा आणि काजूवर होणार आहे. काही बागांमध्ये आंबे पडून वाया गेले आहेत. सरकारकडून याची दखल घेतली जात नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस
सिंधुदुर्ग : विजांच्या कडकडाटांसह जिल्ह्याच्या काही भागात सोमवारी (ता.८) रात्री मुसळधार पाऊस झाला. काही भागात हलक्या सरी कोसळल्या. दरम्यान, या पावसामुळे अतिंम टप्प्यातील आंबा संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वैभववाडी तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. घाटपायथ्याच्या गावांना पावसाने अक्षरक्ष झोडपून काढले. मंगळवारी सकाळी देखील काही भागात पावसाची रिपरिप सुरू होती.जिल्ह्यात सोमवारी सायकांळी चार-पाच वाजण्याच्या सुमारास आंबोली, दोडामार्ग, फोंडा भागात हलक्या सरी कोसळल्या.
रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास करूळ घाट पायथ्याच्या गावांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वादळीवारे आणि विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस पडत होता. करूळ, कुभवंडे, सोनाळी, वैभववाडी, भुईबावडा, खांबाळे, फोंडा परिसरात जोरदार पाऊस झाला. जिल्ह्याच्या पुर्वपट्ट्यातील गावांमध्ये पहाटे सहा वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.