
Kolhapur News : शेतीविषयी तंत्रज्ञान जाणून न घेता व कोणाचाही सल्ला न घेता शेती केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे राज्याचे व देशाचे मोठे नुकसान होत आहे. शेतीतील उत्पन्न आणि उतारा न वाढवल्यास खाद्यान्नाचे संकट येऊ शकते.
योग्य पाणी, खते, बियाणे आणि आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांनी शास्त्रीय शेती केल्यास जमिनीचे पुनर्जीवन होऊ शकते, असा विश्वास माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
अकिवाट येथे श्री दत्त कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली २६० एकरावर क्षारपडमुक्तीच्या कामाचा सर्व्हे प्रारंभ करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते.
चव्हाण म्हणाले, की गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले क्षारपडमुक्त जमिनीचे काम राज्यभर प्रसिद्ध झाले आहे. कराड-कृष्णा नदी काठावरही हा प्रश्न उद्भवत असून, या ठिकाणची शास्त्रीय माहिती व सल्ला घेऊन कराड तालुक्यातही क्षारपडमुक्तीचे काम करण्यात येणार आहे.
माती परीक्षण, खताचा वापर, सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी प्रयत्न आणि आलटून पालटून पिके कशी घ्यायची, प्रतिहेक्टर उत्पन्न वाढीसाठी कोणते प्रयत्न करावेत याचा अभ्यास शेतकऱ्यांनी करणे आवश्यक आहे.
गणपतराव पाटील म्हणाले, की क्षारपडमुक्तीच्या कामामुळे जमिनीतील क्षार बाहेर पडल्याने पडीक जमिनीतूनही चांगल्या पद्धतीचे उत्पादन येत आहे. सेंद्रिय कर्ब वाढवणे व पाण्याचे योग्य नियोजन केल्यास चांगली शेती करून उत्पन्न जादा घेण्यास मदत होणार आहे.
विशाल चौगुले यांनी स्वागत केले. ‘दत्त’चे उपाध्यक्ष अरुणकुमार देसाई, प्रमोद पाटील, दरगू गावडे, अकिवाट सरपंच वंदना पाटील, मलकापूरचे नगराध्यक्ष मनोहर शिंदे, कराड तालुका कृषी अधिकारी मुल्ला, माजी कृषी अधिकारी पटेल, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना आदी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.