
राजेंद्र उगले
शाळेत चुंबकाचे गुणधर्म शिकवताना गुरुजी म्हणायचे, ‘सजातीय ध्रुवांमध्ये असते आकर्षण.’ प्रयोग करताना ते प्रत्यक्ष यायचं अनुभवायला. चुंबकाचा हाच नियम मानवी प्रवाहात प्रकर्षाने जाणवतो तो म्हणजे वारकऱ्यांच्या दिंडीत. लौकिकार्थाने जातीच्या शृंखला तोडून वारकरी ‘माउली’ म्हणत भेटून घेतो उराउरी आणि आकर्षिला जातो पंढरीच्या दिशेनं सजातीय ध्रुव बनून.
वारीत पडतो विसर जाती-धर्माचा, वयाचा, आहाराचा, अहंकाराचा आणि तत्सम ऐहिक सुख-दुःखाचा! मग उरते ती फक्त सगुण भक्ती. युगानुयुगे वारकरी चालत आलेत पंढरीची वाट, सावळ्याच्या दर्शनासाठी. याच दिंडीत चालत आल्या असतील आमच्या मागच्या कित्येक पिढ्या.
तेव्हापासून विठ्ठलही (Vitthal) आहेच उभा कमरेवर हात ठेवून, प्रत्येकाला भेटण्यासाठी. काय असावं बरं नातं वारकऱ्यांचं आणि विठ्ठलाचं? का लागते सर्वांनाच त्याची ओढ? असं काय दडलंय त्या सावळ्या रूपात की माणूस देहभान विसरून चालत राहतो. पायात घुसलेल्या काट्याला, कुरूपाला, आजाराला नसते मुभा सोबत चालण्याची. ‘रामकृष्ण हरी’ म्हणताच दूर होतात वेदना. ‘तुझे नाम चित्ती राहो, मुखी तुझे नाम!’ म्हणत तुळशीमाळ, गोपिचंद, बुक्का अशी आभूषणे परिधान करून संसाराचा विसर पाडून धरली जाते पंढरीची वाट.
हे कोडं उलगडताना मला मात्र सारखं-सारखं वाटतंय की विठ्ठलाचं आणि माझं नातं मातीसारखं असावं! काळ्या वावरातल्या काळ्याच मातीसारखा असणारा विठ्ठल आणि माझ्यातलं सजातीय आकर्षण आहे ते म्हणजे ही काळी माती. मला नाही पडायचं या वादात, की विठ्ठल स्वयंभू की कोणी तयार केली ही चित्ताकर्षक मूर्ती.
पण राहून-राहून वाटतं की माझ्याच कुणी पूर्वजानं बनवली असेल ही मूर्ती. मातीवरच्या त्याच्या प्रेमानं भरले असावेत त्या मूर्तीत पंचप्राण आणि झाला असेल हा सगुण साकार. पुढच्या पिढीतल्या कुणीतरी नेऊन ठेवला असेल त्याला चंद्रभागेच्या (Chandrabhaga) तीरावर.
स्वतःच्या कष्टाची वीट त्यांनं ठेवली असेल याच पांडुरंगाच्या पायाखाली आणि सांगितलं असेल त्याला; ‘सर्वांचे कष्ट असेच ठेव तुझ्या पायाशी दाबून आणि कर आमची सुटका या त्रासातून. कदाचित पुंडलिक असावा माझाच कुणीतरी वंशज!’ मायबापाच्या कष्टाला उतारा मिळावा म्हणून भांडला असेल तो विठ्ठलाशी!
पाऊस पडला की माती होते प्रवाही आणि प्रवाह होते नदी. माती वाहत जाते पाण्याच्या ओढीने आणि होते नदीमय. वारकरीही त्याच मातीच्या ओढीने होतो प्रवाहित आणि रस्त्यारस्त्याने वाहत जातात भक्तिमय पांढऱ्या नद्या चंद्रभागेच्या वाळवंटात. ठिकठिकाणाहून आलेले हे प्रवाह विरून जातात एकमेकांत ‘माउली’ म्हणत! पूर्वाश्रमीच्या रक्ताच्या नात्याने! आणि होतो एकच गजर... विठ्ठल नामाचा!
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.