Water Management : जल व्यवस्थापन कसं करावं?

प्रमुखाच्या मार्गदर्शनाखाली पारंपारिक सेंद्रिय शेतीमध्ये विविध पिकांचे खरिप रब्बीमध्ये योग्य नियोजन करुन बदलत्या काळानुसार त्यात पचेल आणि झेपेल एवढेच नाविन्यपूर्ण बदल करणे आणि ती ही स्वत:ची आर्थिक क्षमता पाहूनच यालाच शेती व्यवस्थापन म्हणतात.
Water Management
Water ManagementAgrowon

Water Management व्यवस्थापन हा कुठल्याही पाठयपुस्तकातील धडा आणि त्यावर आधारित घोकंपट्ठी नसुन प्रत्यक्ष कृतीमधून अनुभवण्याचा विषय आहे.

व्यवस्थापन शिकण्यासाठी फार मोठया शिक्षणाची, पदवीच्या भेंडोळयाची गरज नसते, ते आपोआप तुमच्या रक्तात असावे लागते आणि त्यासाठी लागतात योग्य आणि पिढयापासुन मिळणारे संस्कार. कुटुंब व्यवस्थापनाचा (Family Management) डोलारा पुर्वी घरातील एक प्रमुख पुरुष व्यक्ती समर्थपणे पेलत असे म्हणूनच तिला वटवृक्ष म्हणत.

हा वटवृक्ष उमळला, त्याच्या पारंब्या तुटू लागल्या की कुटूंब व्यवस्थापन कोसळते. आज आपण अनेक घरात हेच पहात आहोत. वृध्दाश्रमाची संख्या वाढणे हे ढासळलेल्या कुटूंब व्यवस्थापनाचे दर्शक आहे. शेती व्यवस्थापन असेच आहे.

प्रमुखाच्या मार्गदर्शनाखाली पारंपारिक सेंद्रिय शेतीमध्ये (Organic Farming) विविध पिकांचे खरिप रब्बीमध्ये योग्य नियोजन करुन बदलत्या काळानुसार त्यात पचेल आणि झेपेल एवढेच नाविन्यपूर्ण बदल करणे आणि ती ही स्वत:ची आर्थिक क्षमता पाहूनच यालाच शेती व्यवस्थापन (Agriculture Management) म्हणतात. यातील एकही गोष्ट आपण करत नाही म्हणूनच आज हे क्षेत्र संपूर्णपणे कोलमडलेले आहे.

व्यवसाय व्यवस्थापन सुध्दा असेच आहे. जेवढी मागणी तेवढाच पुरवठा हे याचे सुत्र आहे. व्यवसाय हा सचोटी, विश्वास, तत्परता आणि वेळेत मागणी पूर्ण सोबत उत्कृष्ट दर्जा यावर अवलंबून असतो. यातील एक जरी धागा उसवला की व्यवसाय जिर्ण होण्यास उशीर लागत नाही.

जलव्यवस्थापन आज आपल्या जिव्हाळयाचा प्रश्न आहे मात्र हा व्यवसाय होऊ शकत नाही, ती सेवा आहे. मी यास निसर्गदेवतेची सेवा समजतो. पाणी हे निसर्गदेवतेचा सर्व जीवांना दिलेला तिर्थरुप प्रसाद आहे.

Water Management
Water Conservation : संवर्धन अदृश्य, दृश्य पाण्याचे...

फरक एवढाच आहे की हा प्रसाद आपणास पुन्हा निर्सगास त्याच अवस्थेत परत करावयाचा असतो आणि यालाच आपण जल व्यवस्थापन म्हणतो. निसर्गदेवतेने दिलेला हा प्रसाद आज आपण तिने हात पुढे करण्याआधीच तिच्या हातातून ओरबाडून घेत आहोत आणि तो परत करण्याचे तर आम्ही केंव्हाच विसरुन गेलो आहोत.

जेंव्हा दात्यापेक्षा अतिथी मोठा होतो तेंव्हा दात्याचे दान क्षीण होऊ लागते. आज दुष्काळात आणि जल टंचाईने भाजला जात असलेला मराठवाडा मला अतिथीच्याच रुपात दिसत आहे, तेथे दात्याचे अस्तित्व कुठे जाणवतच नाही.

Water Management
Water Management : पाण्याचा ताळेबंद कसा मांडायचा?

जलदाना एवढे पुण्याचे कार्य नाही असे एका पंडिताने अकबर बादशहाला सांगितले. बादशहाने फर्मान सोडून एका मंदिराबाहेर लोकांना भर दुपारी उन्हामध्ये रांगेत उभे करुन चांदीच्या सुरयामधून तो तेथे जलदान करण्यास आला.

पंडिताने जलपूजा केली आणि अतिथीच्या ओजंळीमधून जलदानास सुरवात झाली. रांगेतील पाचव्या व्यक्तीने ओंझळ पुढे करुन पाणी पिण्यास सुरवात केली. सुरया रिकाम्या होत होत्या, अर्धे पाणी तोंडात , अर्धे अंगावर सांडत होते पण ओंझळ पुढे तशीच होती.

पुण्याचे काम म्हणून बादशहा नकार देऊ शकत नव्हता, रांगेमधील लोक तहानेने व्याकूळ झाले होते. जलपुजेचे पाणी संपून गेले आणि बादशहा हताश झाला तेंव्हा त्या याचकाच्या वेषामधील बिरबल त्याच्या समोर उभा राहिला त्यावेळी बिरबलाने बादशहाला सांगितलेले शब्द फार महत्वाचे होते.

तो म्हणाला ! “राजन, जल व्यवस्थापन हे फार महत्वाचे आहे. तुमचा उद्देश चांगला होता पण तुम्ही हे विसरलात की जलपूजा केलेले हे पाणी मर्यादित आहे आणि रांगेमधील प्रत्येक याचक म्हणजेच अतिथी एकच ओंझळ पाणी पिऊ शकतो. शेवटी पाणी कुठून आणणास मिळत आहे या पेक्षाही राजा आपणास स्वहस्ते जलदान करत आहे

अशावेळी प्रजेची तहान कांही थेंबामध्ये सुध्दा भागू शकते.” अकबराने बिरबलच्या पाठीवर शाबासकी देत त्याचे कौतुक केले आणि हे असेच होणार हे गृहित धरुन बिरबलाने पूर्वनियोजीत संचित केलेल्या पाण्यामधून बादशहाकडून रांगेमधील उरलेल्या लोकांना जलदान केले.

या बोधप्रद गोष्टीमधून आपणास जलव्यवस्थापनाचा केवढा मोठा अर्थ कळतो. लोकांना तहान लागली असे आपण समजतो पण किती तहान आहे? त्या तहानेवर त्याचे नियंत्रण आहे का?

याचा आपण विचार करत नाही. शेतीचाच विचार करायचा म्हटले तर पारंपारिक पिकांची ओंझळ नेहमी लहान आणि समाधानी असते मात्र ऊसासारख्या पिकांची ओंझळ कधी रिकामी होतच नाही.

Water Management
Water Management : चर्चा पाणी व्यवस्थापनावर व्हायला हवी...

आम्ही हे जल व्यवस्थापन केव्हाच विसरुन गेलो आहोत. मर्यादित जलसाठा असताना कोणती पिकपध्दती वापरावी, जमिनीत कर्ब कसे वाढवावे यांचा आज आम्हाला विसर पडला आहे.

बिरबलाने ओंझळ उघडी ठेऊन अर्धेपाणी अंगावर सांडून घेतले, आज समाजात आपणास असे हजारो वेशांतर केलेले बिरबल पहावयास मिळतात फक्त ते पाहण्यास अकबर बादशहा तेथे नसतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com