Kharif Season Update In Javhar : ग्रामीण भागात खरीप हंगामातील शेतीला विशेष महत्त्व आहे. अल्पभूधारक, शेतमजूर यांच्यासाठी हा सुपीक काळ असतो, परंतु या हंगामात शेतीसाठी वापरण्यात येणारी बियाणे अनेकदा बोगस असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे कृषी विभाग ॲक्शन मोडवर आला आहे. बोगस बियाणे अथवा खते विक्री केल्यास कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले.
खरीप हंगाम अवघ्या काही दिवसावर येऊ ठेपला आहे. त्या अनुषंगाने शेतीपूर्व मशागतीला देखील वेग आल्याचे चित्र आहे. या हंगामात अधिक उत्पन्न मिळावे, यासाठी बळीराजा सर्वतोपरी सज्ज झाला आहे.
शिवाय, कोणत्याही प्रकारे बियाणे अथवा खतांमध्ये फसवणूक होऊ नये, म्हणून कृषी विभागही अलर्ट झाल्याचे चित्र आहे. बोगस बियाणे, जास्त दराने खत विक्री रोखण्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी तालुका स्तरावर पाच अधिकाऱ्यांचे भरारी पथक तैनात केले आहे.
शेतकऱ्यांना योग्य दरात चांगल्या दर्जाचे बियाणे आणि खते मिळावीत, यासाठी तालुका कृषी विभागामार्फत विशेष लक्ष दिले जात आहे. दुसरीकडे बोगस बियाणे, खते विक्री करणाऱ्यांवर प्रशासनाचा वॉच राहणार असून जव्हार तालुका कृषी विभागाच्या वतीने एका स्वतंत्र पथकाची नेमणूक केली आहे.
पावसाळा सुरू होताच बियाणे व खतांचे दर वाढविले जातात. तसेच बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले जाण्याची शक्यता असते. परिणामी शेतकऱ्यांची फसवणूक होऊन दुबार पेरणीच्या संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.