
Solapur News : सोलापूर ते उजनी या समांतर जलवाहिनीचा मक्तेदार बदलूनही कामाला सुरवात झालेली नाही. त्यासंदर्भात पालकमंत्री विखे (Minister Radhakrishna Vikhe Patil) पाटील यांनी शनिवारी (ता. ४) महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
त्यावेळी हैदराबादचा पूर्वीचा मक्तेदार लवादाकडे गेल्याने काम सुरु होऊ न शकल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ९ मार्चला लवादाचा निर्णय काय होतोय, ते पाहून काम तत्काळ सुरू करा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील हे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतानाही शनिवार व रविवार असे दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर आले आहेत.
त्या सर्वच बाबींची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी त्या सर्व विषयांवर त्यांनी माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. दरम्यान, नियोजन भवनातील बैठक संपल्यानंतर त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन समांतर जलवाहिनी व उड्डाणपूलाबद्दल माहिती घेतली.
यावेळी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाचे संचालक सुहास चिटणीस, उपस्थित होते.
मक्तेदार बदलूनही समांतर जलवाहिनी जागेवर?
समांतर जलवाहिनीचे काम पाच वर्षांपासून रखडलेलेच आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन करूनही काम बंद आहे, हे विशेष. तब्बल २६ वर्षांपासून सोलापूरकरांना तीन-चार दिवसाआड पाणी मिळत आहे.
रात्री-अपरात्री पाणी सुटते, तेही केवळ दोन-अडीच तासापुरतेच. त्यात अनेकांना पाणी मिळत सुद्धा नाही. ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ अशी सोलापूरकरांची अवस्था आहे.
हैदराबादचा मक्तेदार बदलून आता कोल्हापूरच्या मक्तेदाराला काम दिले, तरीसुद्धा काम बंदच आहेत. अधिकाऱ्यांनाही त्यातील अडचणी दूर करता येत नसल्याची वस्तुस्थिती आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.