
Sindhudurg Crop Loan News : जिल्ह्यातील खावटी, दोन लाखांवरील कर्जदार आणि मध्यम मुदत थकबाकीदार शेतकऱ्यांकडून सुरू असलेली वसुली तुर्तास थांबवावी, अशी मागणी आंबा, काजू बागायतदारांनी संस्था उपनिबंधकाकडे केली आहे.
राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेचा लाभ खावटी आणि दोन लाखांवरील कर्जदारांना झालेला नाही.
त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी खावटी आणि दोन लाखांवरील कर्जदारांना कर्जमाफी मिळावी यासाठी शासनाकडे मागणी करीत आहेत.
या मागणीसाठी अनेक आंदोलनेदेखील शेतकऱ्यांनी केली आहेत. परंतु अद्याप शासनाकडून ठोस निर्णय झालेला नाही. त्यातच गेली दोन वर्षे कोरोना, अवकाळी पाऊस, बदलते वातावरण यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नाजूक बनली आहे.
शेतकरी अडचणीत आला आहे. परंतु अशाही स्थितीत शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीकरिता तगादा लावला जात आहे.
जोपर्यंत शासनाकडून ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत कर्जवसुली थांबविण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयातील अधीक्षक ऊर्मिला यादव यांच्याकडे देण्यात आले आहे.
कृष्णा चिपकर, महेश चव्हाण, प्रकाश वारंग, संदीप देसाई, शामसुंदर राणे यांच्यासह ३५ हून अधिक शेतकऱ्यांनी त्यांना निवेदन दिले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.